माळशेज/ओतूर – नगर-कल्याण महामार्गावर माती वाहतूक करणाऱ्या दोन डम्परच्या वेगाच्या शर्यतीमध्ये दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन बालकांसह त्यांचे वडील जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 31) सायंकाळच्या सुमारास मढ गावच्या हद्दीत पारगाव फाटा येथे घडली.
याप्रकरणी डम्पर चालकास अटक करून सोमवारी (दि. 1) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, या घटनेत अवघ्या चार आणि दोन वर्षीय बालकांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कविता अशोक जगताप (वय 28 रा. करंजाळे, ता. जुन्नर), प्राजक्त भरत माळी (वय 17 खुबी, ता.) असे मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत. तर अशोक गणेश जगताप, श्रेया (वय 2), आर्यन जगताप (वय 4 रा. करंजाळे, ता. जुन्नर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर विजय अण्णा विटकर असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या डंपरचालकाचे नाव आहे.
अशोक जगताप यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, अपघातातील जखमींवर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, नगरकडून कल्याणच्या दिशेने डम्पर (एमएच 17 एजी 4478) चालक विटकर भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळे आणखी एक डम्पर त्याच रस्त्याने निघाला होता. त्यावेळी दोघांमध्ये वेगाची शर्यतच सुरू होती. दरम्यान, अशोक जगताप दोन्ही मुलांसमवेत कविता, प्राजक्ता असे पाच जण दुचाकीने (एमएच 14 एफबी 3958)ने कल्याणच्या दिशेने निघाले होते. पारगाव फाटा येथे विटकरया डम्पर चालकाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पाचही जण खाली पडले त्यात कविता, प्राजक्ता यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही लहनमुलांसह अशोक जखमी झाले आहेत. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.
महामार्गावर फलकच नाही
नगर-कल्याण महामार्गावर कुठेही वेग नियंत्रक फलक नाही व गतिरोधकांची परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे महामार्गावर कोठेना कोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. तरी महामार्गावर योग्य त्या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसविण्याची आग्रही मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.