– मुंबई, पिंपरी-चिंचवड येथे 2 नवे रूग्ण आढळले
– आरोग्यमंत्र्यांची माहिती
– राज्यात करोनाचा 41 रूग्ण
मुंबई – राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी आणखी दोन नवे करोनाचे रूग्ण आढळले. मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी 1-1 असे दोन रूग्ण सापडले असून राज्यात करोना बाधितांची संख्या 41 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात करोनाचा हा पहिला बळी आहे.
दुबईहून 5 मार्चला परतलेल्या 64 वर्षीय उच्च रक्तदाबाचा त्रास असलेला हा रुग्ण हिंदूजा रुग्णालयातून कस्तुरबा रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी त्यांचे निधन झाले. मंगळवारी आणखी 2 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली अहे. यापैकी एक रुग्ण (49 वर्ष) मुंबईचा असून हा तरुण 7 मार्च रोजी अमेरिकेवरुन परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण (26 वर्ष) हा पिंपरी-चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा तरुण 14 मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 105 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 1169 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 900 जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 779 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 41 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 1169 प्रवाशांपैकी 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. दरम्यान, काल आणि आज राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्था नवी दिल्ली येथील तज्ञ पथकाने पुणे येथे भेट देऊन येथील करोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
पिंपरी चिंचवड मनपा – 10, पुणे मनपा – 7, मुंबई – 7, नागपूर – 4, तसेच यवतमाळ – 3, नवी मुंबई – 3, कल्याण – 3, आणि रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद येथे प्रत्येकी 1 असे एकूण 41 रुग्ण आहेत.
शासनाच्या आवाहनाला खासगी कंपन्यांकडून प्रतिसाद
कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्यशासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांनीही सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनीधींसमवेत बैठक घेतली. कंपन्यांच्या “बैठका व्हर्चुअली’ घेतानाच “वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांनी मान्य केले. त्यांच्या माध्यमातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेंन्टीलेटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
खासगी कंपन्या करणार जनजागृती
त्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवा, आस्थापना, कार्यालये बंद करण्याबाबत शिफारस यावेळी या कंपन्यांनी केल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले. कोरोनाच्या जाणीव जागृतीसाठी खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली असून, सीएसआरच्या माध्यमातून विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. ज्यांचा रोजदांरीवर उदरनिर्वाह आहे, त्यांच्यासाठी काही विशेष सोय करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.