पिंपरी – माझ्या बोटांचा ठसा उमटत नाही… यात माझी काय चूक…मला धान्य द्या…आम्ही काय खायचे? अशी व्यथा एका ज्येष्ठ नागरिकांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली. अंगठ्यावरील रेषा पुसट झाल्याने अनेक वृद्धांना रेशनचे धान्य मिळण्यास अडचणी येत आहेत.
शहरात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना पोट भरण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकान हाच सर्वांत मोठा पर्याय आहे. राशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. असे असतानाच आता बायोमेट्रिकमुळे बोटांचे ठसे उमटत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. दोन वर्षांपासून करोनाकाळात अनेक पात्र शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ, डाळ हे धान्य प्रति लाभार्थी पाच किलोप्रमाणे मोफत वितरित करण्यात आले.
आताही सप्टेंबर 2022 पर्यंत प्रतिपात्र लाभार्थ्याला पाच किलो धान्य देण्यात येणार आहे. मात्र, धान्य वितरणामध्ये बायोमेट्रीकचा अडथळा ठरत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने त्यांना अपात्र धरले जाते. त्यामुळे अशा नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्य मिळत नाही. यावर उपाय काढून ज्येष्ठ नागरिकांना बायोमेट्रीक बंधनकारक करू नये अशी मागणी ज्येष्ठ नागरिक करत आहेत.
नॉमिनेशन करायचे पण कुणाचे?
बायोमेट्रिक पद्धतीत वृद्धांना येणाऱ्या अडचणीमुळे वृद्धांनी कुटुंबाबाहेरच्या कुठल्याही एका व्यक्तीचे नॉमिनेशन करावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या संबंधितांच्या फिंगरप्रिन्टवर धान्य दिले जाईल, असा आदेश देखील आहे. मात्र ज्यांच्या घरामध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक आहेत, अशा वृद्धांनी दुसरी व्यक्ती शोधायची कुठे?
वृद्धांनी खायचे काय ?
उतार वयात जेष्ठ नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. यामध्ये आर्थिक अडचण ही महत्त्वाची असते. अशावेळी शासनाकडून मिळणारे धान्य वेळेत मिळत नसेल तर अशा वृद्धांनी करायचे काय? तांत्रिक अडचणीमुळे धान्य मिळणार नसेल तर अशा वृद्धांनी खायचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मी दोन महिने झाले स्वस्त धान्याच्या दुकानांमध्ये चकरा मारत आहे. माझ्या बोटांचा ठसा उमटत नसल्याने रेशन भेटत नाही. पूर्वी ठसे येत होते. आता दोन महिन्यांपासूनच मशिनवर ठसे उमटत नाही.
– मनोज सिरसाठ, ज्येष्ठ नागरिक.