कानपूर- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधातील इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याविषयी बहुजन समाज पक्षाच्या भूमिकेविषयीचा सस्पेन्स संपला आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी
आगामी लोकसभा निवडणुक त्यांचा पक्ष एकटाच लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तिसरी आघाडी किंवा कोणाशीही युती करण्याबाबतच्या अटकळांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
वास्तविक, उत्तर प्रदेशातील मतविभाजन टाळण्यासाठी इंडिया आघाडीशी जवळीक साधण्यासाठी मायावती यांची विरोधी पक्षांशी चर्चा सुरू होती. मात्र, आघाडीमध्ये सामील झाल्यास आपले हक्काचे मतदारसंघ इतर पक्षांना सोडावे लागतील,लासे दिसू लागल्याने मायावतींनी वरील निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
मायावतींनी लिहिले की, बसपा संपूर्ण तयारी आणि ताकदीने देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढत आहे. अशा स्थितीत निवडणूक युती किंवा तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या अफवा पसरवणे म्हणजे तद्दन खोट्या आणि चुकीच्या बातम्या आहेत. अशा खोडसाळ बातम्या देऊन मीडियाने आपली विश्वासार्हता गमावू नये.
विशेषत: यूपीमध्ये बसपा मोठ्या ताकदीने एकट्याने निवडणूक लढवत असल्याने विरोधक बऱ्यापैकी अस्वस्थ दिसत आहेत. त्यामुळेच ते दररोज विविध प्रकारच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र बहुजन समाजाच्या हितासाठी बसप एकट्याने निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे, यावर मायावतींनी भर दिला आहे.
याआधीही मायावतींनी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारच्या आघाडीत सहभागी होण्यास अनेकदा नकार दिला होता. त्यांनी अद्याप निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले नाहीत, त्यामुळे त्यांच्या इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.