सांगवी, दि. 16 (वार्ताहर) – गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोदार पावसामुळे पवना व मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सांगवीतील मधुबन सोसायटी, मुळानगर झोपडपट्टी, प्रियदर्शनीनगर, संगमनगर, मुळानगर तसेच नदी किनारा परिसरामधील घरांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
पवना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात आहे. सांगवी येथील मुळा नदीपात्राशेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीवासीयांची धाकधूक वाढली आहे. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभाग मुळा व पवना नदीपात्रातील पाण्याकडे लक्ष ठेवून आहे. सांगवी पोलिसांनी त्यांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही नागरिकांना येथून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले नाही. पोलिसांनीही गस्त वाढवली आहे. तसेच नागरिकांना आपली घरे खाली करण्याच्या सूचना पोलिसांनी झोपडपट्टीवासीयांना दिल्या आहेत.
दरवर्षी मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की, सांगवीतील मुळानगर झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जाते. पुराचे पाणी ओसरल्यावर पुन्हा नागरिक आपापले झोपडीवजा घर दुरुस्त करून राहतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परिस्थिती दरवर्षी उद्भवत आहे. यंदाही मुळशी धरण परिसरात जोरदार पाऊस असल्याने मुळा नदीपात्रातील पाणी वाढले आहे.
नागरिकांना पुराची धास्ती
2005 आणि 2019 साली पुराच्या पाण्याचा फटका येथील नागरिकांनी अनुभवला आहे. 2019 साली तर सांगवीतील मधुबन सोसायटी, मुळानगर झोपडपट्टी, प्रियदर्शनीनगर, संगमनगर, मुळानगर नदीकिनारा परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. सध्याही मुळशी धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने दापोडी व जुनी सांगवीकरांची धाकधूक वाढली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सांगवी परिसरातील मुळा व पवना या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.