नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी सहकुटूंब अयोध्यावारी केली. आपचे नेते असणाऱ्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले.
मला रामलल्लाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले. दर्शनाने लाभलेली मन:शांती शब्दांत व्यक्त केली जाऊ शकत नाही. अयोध्येत भव्य आणि सुंदर राम मंदिराची उभारणी संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुदैवाची बाब आहे, अशी भावना केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तर, भारत हा वैविध्यपूर्ण धार्मिक श्रद्धा बाळगणारा देश आहे.
देशात शांतता आणि बंधूभाव नांदो अशी प्रार्थना आम्ही केली, असे मान यांनी नमूद केले. केजरीवाल, मान आणि त्यांचे कुटूंबीय जवळपास सव्वातास राम मंदिर आणि परिसरात उपस्थित होते.
अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. विविध पक्षांच्या नेत्यांप्रमाणेच केजरीवाल यांनाही त्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्या सोहळ्यात सहभागी होण्याऐवजी नंतर कुटूंबीयांसह अयोध्येला भेट देण्याची भूमिका त्यांनी मांडली होती.