मुंबई – नफा काढून घेण्यासाठी आज गुंतवणूकदारांनी छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री केल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप मोठ्या प्रमाणात कोसळले. मुख्य निर्देशांकांचे कमी नुकसान झाले. सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता रेंगाळली आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 523 अंकांनी कोसळून 71,072 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 166 अंकांनी म्हणजे 0.76 टक्क्यांनी कोसळून 21,616 अंकावर बंद झाला. धातू, बँकिंग, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. तर सध्याच्या परिस्थितीतही औषधी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकात काही प्रमाणात वाढ झाली.
यासंदर्भात विश्लेषकांनी सांगितले की, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे कोणतेही निमित्त होऊन काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी कमालीचे सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे.
जओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, एकूणच परिस्थिती इतकी अस्थिर आहे की, यासंदर्भात लघु पल्ल्यात विशिष्ट भूमिका घेणे अवघड झाले आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी कोसळला. त्यानंतर एनटीपीसी, स्टेट बँक, इंडसइंड बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो व या कंपन्याच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
मात्र या कंपन्यांचा मुख्य निर्देशांकावर फार कमी परिणाम होत नसल्यामुळे त्याचा निर्देशांकांना आधार मिळाला नाही. भारतीय शेअर बाजारात मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त झाल्याची भावना सध्या वाढली आहे. त्यामुळे आज शेअर बाजाराचा मिडकॅप तब्बल तीन टक्क्यांनी तर स्मॉल कॅप संव्वातीन टक्क्यांनी कोसळले. त्याचबरोबर रिअॅॅल्टी, ऊर्जा, धातू आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्राचे निर्देशांक जवळजवळ तीन टक्क्यापर्यंत कोसळले होते.