कामगारांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली
चिंबळी – कुरुळी (ता. खेड) हद्दीतील पीसीपी या पुठ्ठ्यांचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्याला (दि. 3) रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर तात्काळ कंपनीतील कामगारांना) बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने संपूर्ण कारखाना वेढला व कंपनीतील कच्चा पक्का माल, यंत्रसामुग्री, कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चाकण एमआयडीसीचा अग्नी बंब, पाण्याच्या टॅंकरने आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाट्यापासून काही अंतरावर कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील गट नंबर 624/4,624/6 मध्ये ही कंपनी आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, संबंधित कंपनीमध्ये शॉकसर्किटमुळे आग लागली. कंपनीत पुठ्ठा, फोम असल्यामुळे आगीने काही क्षणांमध्ये रौद्ररूप धारण केले. याची माहिती तात्काळ चाकण व महाळुंगे इंगळे पोलिसांना आणि अग्निशमन दलाला दिली.
एमआयडीसी व पिंपरी चिंचवड महापालिका यांचे प्रत्येकी एकेक अग्निबंब, चार पाण्याचे टॅंकरने तीन तासांत ही आग आटोक्यात आणली. जळीत घटनेचा पंचनामा तलाठी दीपक जाधव यांनी करून हा पंचनाम वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये भय संपत नाही
गेल्या पाच ते सहा वर्षांत चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये आगीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. येथील सुरक्षा साधने, उपचार अन्य बाबतीत सुविधा देण्याची मागणी जोर धरत आहे. येथील परिसरात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे लाखोची वर्दळ असते. त्यामुळे अग्निप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.