-डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी
गणपती बाप्पाचे आगमन झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मात्र, दरवर्षीचा उत्साह यावेळी दिसत नाही. कारण करोनाचे काळे ढग आपल्या डोक्यावर आहे. मात्र, या उत्सवात अतिउत्साह दाखविणे घातक ठरू शकते. करोना सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना आणि नियमावलीचे पालन करूनच आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. गणपती विघ्नहर्ता आहे असे आपण मानतो त्यामुळे करोनाचे विघ्न लवकर जावो, अशी प्रार्थना गणरायाकडे करायची आहे.
“एकीकडे करोनाचं सावट तर दुसरीकडे गणेशोत्सवाचा उदंड उत्साह मनात दाबून ठेवावा लागत आहे, सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न उभा आहेच. अशा प्रतिकूल परिस्थितीत हा उत्सव साजरा होत आहे. उत्सवातील उत्साहाला थोडी मुरड घालून आपली सुरक्षितता जपली तरी आजच्या घडीला एवढे पुरेसं आहे.
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राचा भूषणास्पद सांस्कृतिक ठेवा म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात केली. राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मता जतन करून प्रतिकुलतेला तोंड देण्याचे सामर्थ्य समाजशक्तीत उभे राहावे, असे टिळकांचे विचार होते. प्रारंभीच्या काळात या ज्ञानदेवतेचा उत्सव करणारे कार्यकर्ते सामाजिक भान ठेवून काम करीत असल्यामुळे त्यातूनच अनेकदा राजकीय नेतृत्वसुद्धा उदयाला आले. उत्तम कलावंतांना चांगले व्यासपीठ मिळाले. देशासमोरच्या प्रश्नांची चिकित्सक चर्चा करणारी गणेश मंडळे महाराष्ट्राच्या गावागावांत उभी राहिली. सहकुटुंब गणेशोत्सवाचे देखावे पाहणे हा एकेकाळी अत्यंत आनंदाचा भाग असे. आजही देखाव्यांची चढाओढ असते. अनेक कलावंतही काम करीत असतात. कार्यकर्ते रात्रंदिवस राबत असतात. महिना-दीड महिना घरदार न पाहता कार्यकर्त्यांची फळी काम करते. मात्र, यावर्षी थोडा विराम मिळाला आहे.
भक्तांकडून मिळणारा निधी सामाजिक कार्यात वापरून विधायक काम करणारी मंडळेही आहेत; परंतु त्यांची संख्या कमी झाली आहे. अर्थकारणाने प्रचंड वेगवान वळण घेतले आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची जागा कंत्राटदारांनी घेतली आहे. भक्ती, श्रद्धा, उपासना, ज्ञान, आराधना, पावित्र्य यापेक्षाही भपका आणि प्रसिद्धी अधिक उजळ झाली आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते तन-मन-धनाने राबत असतात, त्यांच्यापेक्षा अपप्रवृत्ती बलवान होत असल्याचे सार्वजनिक मत तयार झाले आहे. शिस्तबद्ध वागणारी मंडळे आणि कार्यकर्ते यांच्यापेक्षाही बेशिस्तीची चर्चा अधिक होत आहे, अर्थात ही गोष्ट स्वाभाविक आहे.
गणनायकाचे अर्थात गणेशाचे वर्णन सुखकर्ता, विघ्नहर्ता असे केले जात असले तरी आता करोनाच्या पार्श्वभूमीवर या मंगलदायी सणाच्या काळात या संसर्गाने रौद्र रूप धारण करू नये याची अधिक काळजी घ्यावी लागेल. इतर सण-उत्सव आणि गणेशोत्सव साजरे करण्याच्या बाबतीत काही मूलभूत फरक आहेत. इतरही अनेक सण सार्वजनिक पातळीवर साजरे केले जातात. तरीसुद्धा गणेशोत्सवात होणारी गर्दी, मिरवणुका, त्याला मिळणारा प्रतिसाद यांची इतर सणांशी तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे हा उत्सव सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा ठरतो. उत्सवात उत्साह तर हवाच त्याचबरोबर तो अधिकाधिक सुरक्षित कसा करता येईल यासाठी आपले प्रयत्न करणे आणि यालाच सर्वोच्च प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरते.
गणेशोत्सव आणि महाराष्ट्र असा घनिष्ठ संबंध आहे. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने करावा लागणार आहे, असे असले तरी उत्सव साजरा होणार आहे एवढे मात्र नक्कीच आहे. आतापर्यंत धुमधडाक्यात उत्सव साजरा करण्यात आला आहे, हे सत्य असले तरी साधेपणाने उत्सव साजरा करून सामाजिक भान जपणे, हे आपले आद्यकर्तव्य असल्याने ते जपणे आवश्यक ठरते. कारण करोना परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही सार्वजनिक उत्सवाची संकल्पना तत्कालीन स्थितीत अत्यंत प्रभावी ठरली. तेव्हा ब्रिटिशांचे वर्चस्व होते. त्यांना शह देण्यासाठी एकत्र येणे ही त्यावेळची नितांत गरज होती. आता स्थिती अगदी उलट आहे. एकमेकांपासून अंतर राखत प्रत्येक गोष्ट करावी लागत आहे. यावर्षी देखाव्यांना पूर्णपणे बंदी घातली असल्याने हा गणेशोत्सव अगदी साधेपणाने, निर्विघ्नपणे, सुरक्षिततेची दखल घेऊन पार पडेल, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?