नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्या जागेवर छापे टाकणारे ईडीचे अधिकारी छाप्याची कोणतीही कारवाई न करता त्यांच्या घराच्या दिवाणखान्यात बसून राहिले होते. त्यांनी झडती घेण्याचे कोणते नाटकही केले नाही, असे दिल्लीच्या मंत्री आतिशी (Delhi minister Atishi) यांनी म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी कोणत्याही खोल्यांची झडती घेतली नाही किंवा कोणतीही कागदपत्रे पाहिली नाहीत. ते कोणत्या प्रकरणात गेले होते हे सांगण्याचीही पर्वा त्यांनी केली नाही, असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.आतिशी यांच्या दाव्यांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता संदर्भात हे छापे टाकण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे होते. पंचनामा दस्तऐवजात असे दिसून आले आहे की ईडी टीमने कुमार यांच्या घरातून फक्त दोन जीमेल खाते डाउनलोड केले आणि तीन कौटुंबिक फोन ताब्यात घेतले, असा दावा आतिशींनी केला. ईडीचे छापे म्हणजे केजरीवाल यांना चिरडण्यासाठी केलेली एक कारवाई होती. त्यात काहीही तथ्य नाही.
केजरीवाल हेच मोदी व शहांच्या मुजरीला आव्हान देत आहेत. त्यामुळे केजरीवालांवर त्यांचा राग आहे असे त्या म्हणाल्या. बिभव कुमार यांच्या व्यतिरिक्त, आपचे खजिनदार एन डी गुप्ता यांचे कार्यालय, माजी डीजेबी सदस्य शलभ कुमार यांचे निवासस्थान, चार्टर्ड अकाउंटंट पंकज मंगल आणि आपशी संबंधित काही इतरांना एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर ईडीने छापे टाकले.