कवठे – जिल्ह्यातील करोनाची स्थिती गंभीर होत चालली असून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळेच करोना रुग्णांची साखळी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत ग्रामस्थ सावध आहेत. तरीही जिल्ह्याच्या सीमेवरून हे लोक जिल्ह्यात प्रवेश कसे करतात, या मूळ प्रश्नाचे उत्तर कोणी शोधत नाही, हेच जिल्ह्याचे दुर्दैव आहे. बाहेरून येणारी व्यक्ती करोनाबाधित निष्पन्न झाली की तो परिसर कंटेनमेंट झोन जाहीर होतो आणि लोकांची गैरसोय होते. त्यामुळे घरी बसून काळजी घेणाऱ्या लोकांनाच अधिक त्रास होतो. प्रामाणिकपणे आदेश पाळून कोरनाशी लढणारे मात्र भरडले जात आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश भागात करोनाचे आगमन झाले ते परजिल्ह्यातील व्यक्तींच्यामुळे. स्थानिक पातळीवर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागामध्येसुद्धा पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार लोकांनी करोनापासून बचावाचे सर्वच प्रयत्न केले. जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कराड तालुक्यात वाढला. जिल्हा सतर्क झाला. लोक घराबाहेर पडायचे बंद होऊ लागले आणि आपल्या जिल्ह्यात आलेले संकट आपल्या गावापर्यंत पोहचू नये, यासाठी प्रशासनापासून ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले.
गावोगावी करोना दक्षता समिती स्थापन झाल्या अन गावाची कधी नव्हे ती अहोरात्र राखण केली गेली. राखण यासाठीच की आपल्याच गावातील परजिल्ह्यात असलेला गावकरी बाधित होऊन गावात येऊ नये व त्याच्यामुळे संपूर्ण गाव किंवा शहर संकटात सापडू नये म्हणून प्रत्येकजण सतर्क झाला. यातून ग्रामस्थ व परगावी असणारे ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक वादावादीचे प्रसंग पण उदभवले. तरीही करोनाने जिल्ह्यात हातपाय पसरलेच.
जिल्हा बंदी असताना पालिका आयुक्त ते पोलीस अधिकारी यांची विशेष पत्रे घेवून आजही राजरोसपणे परजिल्ह्यातून नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत आणि केवळ त्यांच्याकडे परवाना आहे म्हणून त्यांना आपापल्या गावी किंवा शहरी प्रवेश दिला जातोय. मग नियम म्हणून त्यांची आरोग्य तपासणी केली जातेय आणि त्याला होम क्वारंटाइन केले जातेय. त्या व्यक्तींना क्वारंटाइन केल्यावर तो ज्या घरात आलाय त्या घरातील इतर व्यक्ती एकत्रच वागतात व क्वारंटाइन व्यक्ती घरात बसतोय तर कुटुंबातील बाकीच्या व्यक्ती राजरोसपणे घराबाहेर फिरतात, याकडेही दुर्लक्ष होते.
दोष नसताना प्रतिबंधित होण्याची वेळ
वेळे येथे मुंबईहून व्यक्ती आली. गावी कोणीच नाही म्हणून आजारी पडल्यावर सातारा रुग्णालयातून पाहुण्यांच्या घरी चिंचणेर येथे मुक्कामाला गेली व पुन्हा सातारा रुग्णालयात तपासणीसाठी आली . पुढील उपचारासाठी काळजी घेण्यासाठी त्या व्यक्तीस मुंबई येथे पाठवण्यात आले. यात चिंचणेर व वेळे ग्रामस्थांचा काय दोष व त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र झालेल्या आसपासच्या 3 ते 7 किलोमीटर परिसरातील लोकांचा दोष नसताना त्यांना मात्र आज प्रतिबंधित होऊन बसण्याची वेळ आली आहे. यामुळे काळजी घेत असलेल्या नागरिकांना त्रास होतेय, हेही लक्षात घेतले पाहिजे.