मंचर/दावडी (प्रतिनिधी) – पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. आज, पर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर, पुणे जिल्ह्यात अंदाजे 60 ते 70 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसांत सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते शासनाला सादर करण्यात येणार, असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केली, त्यावेळी कळंब (ता. आंबेगाव) येथे त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जुन्नरचे गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, टी. के. चौधरी, सतीश शिरसाट उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे डॉ. दीपक म्हैसकर यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या नुकसानग्रस्त द्राक्ष, काकडी, झेंडू व सोयाबीन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.
दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होणार
जिल्ह्यात कांदा, बटाटा, सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळू शकेल, असे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
“जिओ टॅगिंग’चा वापर
शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून फोटो काढून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विमा कंपन्याच्या अधिकारी-प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी केली चर्चा
डॉ. म्हैसेकर यांनी वडगाव-घेनंद (ता. खेड) येथील संपत भिकू बवले, ज्ञानेश्वर बवले, रामचंद्र मधुकर कुलकर्णी, बबन नरहरी घेनंद-पाटील यांच्या शेतातील कोबी, मका, सोयाबीन, भुईमूग, बीट पिकांची, कळंब (ता. आंबेगाव) येथील द्राक्ष बागायतदार सिताराम रावजी वर्पे यांच्या द्राक्ष पिकाची, विश्वनाथ लक्ष्मण विश्वासराव यांच्या झेंडू आणि काकडी पिकाची आणि अरुण दशरथ रामकर यांच्या सोयाबीन, पेठ (ता. आंबेगाव) येथील सुरेश धोंडिबा धुमाळ आणि जयंत काशिनाथ थिटे यांच्या शेतातील बटाटा, कांदा, मका, एकलहरे (ता. आंबेगाव) गावातील प्रमोद ढमाले यांच्या शेतीची पाहणी केली. तर जुन्नर तालुक्यातील सावरगाव-आर्वी येथील शांताराम कोरडे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील विठ्ठल खांडके, हिराबाई खांडके, गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील तुळशीराम ढवळे यांच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.
रब्बीसाठी तातडीने कर्ज
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना रब्बी हंगामासाठी तातडीने कर्ज देण्याच्या बॅंकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी बॅंकांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.