जामखेड – विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना विमा भरून सासूरवास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी असलेले पत्र कृषी विभागाने खासदारांना द्यावे, आम्ही वेठीस धरणाऱ्या विमा कंपन्यांचा बंदोबस्त करू. तसेच सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाल्याशिवाय अधिकाऱ्यांनी एकही यादी शासनाकडे पाठवू नये, अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिल्या.
जामखेड येथे खा. डॉ. विखे पाटील यांनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, अशोक शेळके, मंडलाधिकारी सुरेश वराट, पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री मोरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सुधीर राळेभात, अमोल राळेभात, बंकट बारवकर, किसनराव ढवळे, भारत काकडे, प्रा. अरुण वराट, कैलास वराट, अमोल राळेभात, युवराज मुरुमकर, महादेव डुचे, सागर सदाफुले, काकासाहेब चव्हाण, गणेश कोल्हे, हनुमंत उतेकर, मनोज कुलकर्णी, तुषार बोथरा यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
खा. डॉ. विखे म्हणाले, अतिवृष्टीने नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. सरसकट सर्व नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना देत आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झाल्याशिवाय अधिकाऱ्यांनी एकही यादी शासनाकडे पाठवू नये सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून तीन दिवसात शेतकऱ्यांना पंचनामा पत्र द्यावे अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुक्यातील रस्त्यांविषयी खा. विखे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील वाहतूककोंडी विषयी बोलताना, शहरातील टपऱ्या वाचविण्यासाठी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बायपास गरजेचा आहे. लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच पुढील आठवड्यात आमदार रोहित पवार व आपण संयुक्तपणे आढावा बैठक घेऊन सर्वच विभागांचा सविस्तर आढावा घेऊ असेही सांगितले.