मुंबई – मुंबईतील उत्तर-पश्मिच लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम समोर-समोर ठाकले होते. दोन्ही नेत्यांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. पण, या वादावर आता दोन्ही नेत्यांकडून पडदा टाकण्यात आला आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रामदास कदम यांना वर्षा निवासस्थानी बोलावले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, “कीर्तीकर आणि माझ्यात राजकीय फटाके फुटले मात्र आता भविष्यात दोघांकडून वाद होणार नाहीत. वाद झाल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार. माध्यमांमध्ये जाणार नाही. भविष्यात वाद होऊ नयेत अशा एकनाथ शिंदे यांच्याकडून सूचना मिळाल्या आहेत. आता कुठलाही वाद नाही. 100 टक्के वाद मिटला आहे. कीर्तीकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सुरुवात कीर्तीकरांनी केली होती. मला पक्षामध्ये मतभेद ठेवायचे नाहीत.”
गजानन कीर्तिकर यांच्याकडूनही वादावर पडदा –
दरम्यान, गजानन कीर्तिकर म्हणाले, “रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. याप्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकण्यात आला आहे. मी माझ्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मला विश्वास आहे.”
आम्हीच भांडत बसलो, तर शिवसैनिकांपर्यंत चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे रामदास कदमांनी कितीही टीका केली, तर मी कुठलंही भाष्य करणार नाही. तसा शब्द एकनाथ शिंदेंना दिला आहे.”
नेमका वाद काय?
रामदास कदमांनी पहिल्यांदा मुंबईतील उत्तर-पश्मिच लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकरांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तर पूत्र सिद्धेश कदम लढवेल, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर गजानन कीर्तिकरांनी प्रसिद्धीपत्रक काढत रामदास कदमांवर हल्लाबोल केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदमांनीही कीर्तिकरांवर वैयक्तिवर पातळीवर जाऊन टीका केली होती.
दरम्यान, आता दोन्ही नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा टाकण्यात आला आहे.