नवी दिल्ली -लडाखमधील कोंडी फोडण्याच्या उद्देशातून भारत आणि चीनमध्ये उद्या (शुक्रवारी) लष्करी पातळीवरील चर्चेची आठवी फेरी होणार आहे. त्यावेळी व्यापक आणि तातडीने सैन्यमाघारीचा आग्रह भारतीय लष्कराकडून धरला जाणार आहे.
चीनी कुरापतींमुळे पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत काही महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. चीनी सैनिकांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे सीमेलगत मे महिन्याच्या प्रारंभापासून तणाव निर्माण झाला. सध्या दोन्ही देशांचे प्रत्येकी 50 हजार सैनिक एलएसीलगत तैनात आहेत. त्यामुळे जवळपास सहा महिन्यांपासून त्या भागात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे.
ती कोंडी फोडण्यासाठी दोन्ही देशांत लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. चर्चेवेळी चीनकडून सैन्यमाघारीची तयारी दर्शवली जाते. प्रत्यक्षात चीन सैन्यमाघारीचे पाऊल उचलत नसल्याचे दिसते. त्यामुळे चर्चेच्या नव्या फेरीतून तरी कोंडी फुटणार का, याबाबत उत्सुकता आहे. ती चर्चा एलएसीच्या भारतीय बाजूला चुशूलमध्ये होणार आहे.