-अशोक भगत
सध्या जे विकासाचे मॉडेल प्रमाण मानून वाटचाल करीत आहोत, ते निसर्गास पूरक नाही. उलट निसर्गावर विजय मिळविण्याच्या रणनीतीतून आलेले हे मॉडेल आहे. ज्या वातावरणात आपण वास्तव्य करतो, त्याच्या दृष्टीने हे मॉडेल हिताचे नाही. त्यामुळे आता विकासाच्या अशा मॉडेलवर विचारविनिमय सुरू झाला आहे, ज्यामुळे निसर्गाची कमीत कमी हानी होईल.
करोनाच्या महामारीपासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी काही उपाययोजना शोधून काढल्या. मात्र, आगामी काळात अशा प्रकारचे अनेक आजार मानवजातीला त्रस्त करीत राहतील. कोविडच्या दुसऱ्या लाटेचे विषाणू पहिल्या लाटेच्या विषाणूंपेक्षा वेगळे होते. कोविड विषाणू सातत्याने आपले प्रारूप बदलत आहेत. त्यामध्ये उत्परिवर्तन होत आहे. सतत नवनवीन व्हेरिएंट समोर येत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञही किंकर्तव्यमूढावस्थेत आहेत. अखेर हे सगळे कशामुळे होत आहे? हा प्रश्न “आ’ वासून मानवजातीपुढे उभा आहे. विज्ञानात सखोल रस घेणारे आणि संशोधनांवर नजर असणारे काहीजण असा दावा करतात की, आपल्या पृथ्वीचे जलवायू परिवर्तन होत आहे.
जलवायू परिवर्तनावर जगभरात चर्चा होत आहे. आपल्या विकासाच्या संकल्पनांमुळे हे परिवर्तन उत्पन्न झाले आहे आणि विकासाच्या या संकल्पना बदलून आपण त्यावर मात करू शकतो, यावर जलवायू परिवर्तनाविषयी चिंतन करणाऱ्या समूहातील देशांच्या प्रमुखांचे एकमत आहे. भारत हा या समूहातील एक महत्त्वाचा देश आहे. जगातील प्रभावशाली राष्ट्रांनी आपल्या विकासविषयक संकल्पना बदलाव्यात असे भारत पहिल्यापासूनच सांगत आला आहे. या संकल्पनांमुळेच निसर्गाचे नुकसान होत आहे आणि आगामी काळात याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. वस्तुस्थिती पाहिल्यास लक्षात येते की, सध्या आपण जे विकासाचे मॉडेल प्रमाण मानून वाटचाल करीत आहोत, ते निसर्गास पूरक नाही. उलट निसर्गावर विजय मिळविण्याच्या रणनीतीतून आलेले हे मॉडेल आहे. ज्या वातावरणात आपण वास्तव्य करतो, त्याच्या दृष्टीने हे मॉडेल बिलकूल हिताचे नाही. त्यामुळे आता विकासाच्या अशा मॉडेलवर विचारविनिमय सुरू झाला आहे, ज्यामुळे निसर्गाची कमीत कमी हानी होईल.
बदलत्या नैसर्गिक स्वरूपात “जीवन आणि जीविका’ यांचे रक्षण करणे हे प्रचंड मोठे आव्हान आहे. ते स्वीकारून आपण नावीन्यपूर्ण संकल्पनांवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. या नवसंकल्पना संशोधन आणि मूलभूत भौतिक आणि संघटनात्मक संरचनेवर आधारित तर असायलाच हव्यात; शिवाय शेतीतील नवविचार, सहभागी ज्ञाननिर्मिती याबरोबरच जीवनकौशल्ये आणि उपजीविका हे घटक या नवसंकल्पनांच्या केंद्रस्थानी असायला हवेत. गेल्या वर्षी आपल्या देशात कोविड संकटकाळात आपल्या सरकारने अन्नधान्याची कमतरता कुणाला भासू दिली नाही. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी आहोत, म्हणून हे शक्य झाले; परंतु आपल्याला येथेच थांबून चालणार नाही. कारण जलवायू परिवर्तनाच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. केंद्र सरकार या दिशेने पूर्वीपासूनच काम करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद शेतीच्या अत्याधुनिक पद्धती विकसित करण्यावर वेगाने काम करीत आहे आणि त्याचा प्रभाव दिसूही लागला आहे. राज्य सरकारसुद्धा याच दिशेने काम करीत आहे.
जलवायू परिवर्तनाच्या संभाव्य धोक्यापासून भारतीय शेतीचा बचाव करण्यासाठी 2011 मध्ये “क्लायमेट इंटिग्रेटेड ऍग्रिकल्चर’ ही योजना तयार करण्यात आली होती आणि तिच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर 125 कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून नवसंकल्पनांचा विकास सुरू करण्यात आला होता. याअंतर्गत शेतकऱ्यांना नवप्रणालींचा अभ्यास करणे, पिकांमधील वैविध्याला चालना देणे, पशुधनाचे प्रभावी व्यवस्थापन, शेती उत्पादनांचे मूल्यवर्धन, शेती आणि शेतकरी दोन्ही बाजाराभिमुख बनविणे आदी कामे केली जात आहेत. या योजनेत जलस्रोतांच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष देण्यात आले आहे. गावागावांत बीजपेढ्यांची निर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर परंपरागत आणि स्थानिक पिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. जैविक आणि कमी उत्पादनखर्च असणारी शेती करण्यासाठी व्यापक प्रमाणावर काम केले जात आहे.
करोना महामारीमुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीत या प्रयत्नांना आणखी गती देणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात आपल्यासमोर जीवन वाचविण्याचे आव्हान तर आहेच; परंतु जीविकेवरही संकटाचे ढग जमा झाले आहेत. अशा स्थितीत एक निश्चित दिशा आपल्याला ठरवावी लागेल. ग्रामीण भारत मजबूत करावा लागेल. भारताचे हे एकमेव क्षेत्र असे आहे, जे संपूर्ण देशाच्या समस्यांवर तोडगा काढू शकेल. राष्ट्रीय विकास मानकांमध्ये उद्योग पिछाडीवर पडत असताना शेतीचे क्षेत्र आपल्याला उत्साह देत आहे. भारत पूर्वापार निसर्गपूजक देश आहे. आद्य ग्रंथ वेदांपासून आधुनिक आणि उत्तर आधुनिक रचनांमध्येही निसर्गाची आराधना पाहावयास मिळते. ओडिशा, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमधील बहुतांश क्षेत्रांमध्ये भगवान जगन्नाथाचा प्रभाव आहे.
वर्षा ऋतूमध्ये भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्याची परंपरा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. याच काळात वृक्षारोपण करण्याची परंपराही या भागांत आहे. हा परिपाठ धर्माशी जोडण्यात आला आहे. रथयात्रेच्या दिवशी जर रोपे लावली गेली, तर ती दीर्घजीवी असतात अशी धार्मिक मान्यता आहे. तसे पाहायला गेल्यास संपूर्ण देशभरात वर्षा ऋतूमध्ये पेरणीबरोबर वृक्ष लागवडीची परंपरा आहे. या परंपरेला धार्मिक अधिष्ठान प्रदान करण्यात आले आहे. पाश्चात्य विचारधारेवर आधारित जागतिक पर्यावरण दिवस भारतीय निसर्गाला अनुकूल नाही. त्यामुळे जर भारताने पर्यावरण संरक्षण मोहिमेचा संबंध भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेशी जोडला, तर त्याचे अधिक चांगले परिणाम दिसू शकतील.