अहमदाबाद – अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरीत झाले असून हे वादळ 15 जूनला दुपारच्या सुमारास सौराष्ट्र-कच्छ आणि लगतच्या पाकिस्तान किनारपट्टीवरून भूभागात येण्याची शक्यता आहे असे आहे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले.
पूर्व मध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय रविवारी सकाळी पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 480 किलोमीटर, द्वारकेपासून दक्षिण-नैऋत्येला 530 किलोमीटर आणि कच्छमधील नलियाच्या दक्षिण-नैऋत्येस 610 किलोमीटर अंतरावर होते.
आज पहाटे पाच वाजून 50 मिनीटांनी या वादळाने अत्यंत तीव्र स्वरूप धारण केले असून सौराष्ट्र आणि कच्छ तसेच लगतच्या पाकिस्तानच्या किनारपट्टीला 15 जूनच्या दुपारच्या सुमारास ते गुजरात मधील मांडवी,पाकिस्तानातील कराची, किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता आहे.
दिवसा वाऱ्याचा वेग सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवर 40-50 किमी प्रतितास इतका राहील आणि तो वेग नंतर 60 किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. पुढील काळात याचा वेग सुमारे 70 किमी प्रतितास इतका राहील.बुधवारपर्यंत गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र किनारपट्टीवरील समुद्री लाटांची स्थिती अत्यंत उग्र राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने 15 जूनपर्यंत या प्रदेशातील मासेमारी पूर्णपणे स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे आणि मच्छिमारांना 12-15 जून दरम्यान मध्य अरबी समुद्र, उत्तर अरबी समुद्रात आणि 15 जूनपर्यंत सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर जाऊ नये असा सल्ला दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही या बाबतीत बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला असून संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांनाहीं दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.