इंदूर – कॉंग्रेसला ध्रुवीकरणात अडकायचे नाही, आम्ही तो मुद्दा भारतीय जनता पक्षावर सोडला आहे असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भावनांच्या मुद्यांवर चर्चा करू नका, फक्त विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करूया. भावनिक मुद्द्यांना काही किंमत नसते आणि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की भारत हा विविधतेचा देश आहे. आम्हाला कोणत्याही ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर जायचे नाही आणि आम्ही तो अध्याय भाजपवर सोडतो, असे ते म्हणाले.
शिवकुमार दोन दिवसांच्या मध्यप्रदेश दौऱ्यावर आले आहेत. कर्नाटकातील मागील भाजप सरकारने आरएसएस आणि त्याच्याशी संलग्न संघटनांना दिलेली जमीन परत घेतली जाईल का, असे विचारले असता ते म्हणाले, अशा समस्या संबंधित खात्याचे मंत्री पाहत असतात. सर्वजण कोण पात्र आहेत, कोण सर्व चांगली सेवाभावी कामे करत आहेत याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतील.
कर्नाटकने बजरंग दल सारख्या संघटनांवर बंदी घालण्याच्या निवडणुकीतील आश्वासनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, कोणतीही संघटना अशांतता आणण्याचा, राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही त्यांचा शोध घेत घेऊन योग्य ती कृती करू. नैतिक पोलिसिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि कोणीही विनाकारण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. कर्नाटक हे विकसनशील राज्य आहे आणि आम्ही शांतता प्रस्थापित करून कार्यरत राहू असे त्यांनी नमूद केले.
मध्य प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या मुद्द्यावर शिवकुमार म्हणाले, लोकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. सध्याचे सरकार अयशस्वी झाल्याचे त्यांना समजले आहे. विरोधकांची भूमिकाही लोकांनी पाहिली आहे. कॉंग्रेसला पूर्ण आणि स्पष्ट बहुमतासह मध्यप्रदेशात जनादेश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.