सेसद्वारे जमा झालेला 3.59 लाख कोटींचा निधी वापराविनाच पडून
गेल्या पाच वर्षात जमा झालेल्या निधीचा विनीयोगच नाही
नवी दिल्ली – मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात सरकारकडे सेसच्या रूपात जमा झालेली तब्बल 3 लाख 59 हजार कोटी रूपयांची रक्कम वापरलेलीच नाही असे दिसून आले आहे. ही रक्कम भारत सरकारच्या स्वतंत्र खात्यात तशीच पडून आहे. मोदी सरकारच्या आर्थिक अनागोंदीचा हा कळस आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत हा आरोप केला. त्यांनी या संबंधात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचाही हवाला दिला आहे. सन 2015 ते 2020 या अवधीत सरकारकडे सेसच्या स्वरूपात हा निधी जमा झाला आहे. विविध करांवर हा स्वतंत्र सेस लावला जातो. त्यात शिक्षण, स्वच्छता अशा कारणासाठीही सरकार सेस लाऊन निधी जमा करीत असते. सुजेवाला यांनी म्हटले आहे की सरकारने केंद्रीय विद्यापीठांमध्ये मोठी फी वाढ केली. त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांनी लाठीमार अश्रूधुराचाही वापर केला. पण उच्च शिक्षणाच्या सेसद्वारे सरकारकडे जो एकूण 49 हजार कोटी रूपयांचा निधी जमा आहे त्याचा वापर करावासा त्यांना वाटला नाही.
सरकारने हवा प्रदुषणावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून जो सेस जमा केला आहे त्याचेही 38 हजार 943 कोटी रूपये गेल्या पाच वर्षात जमा झाले असून ते पैसेही तसेच विनावापर पडून आहेत असेही सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. क्रुड ऑईलवरचाही 74 हजार 162 कोटीचा सेस सरकारच्या तिजोरीत वापराविना पडून आहे असेही सुर्जेवाला यांनी निदर्शनाला आणून दिले. असे एकूण 3 लाख 59 हजार कोटी रूपये सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून आहेत. सरकारच्या आर्थिक अनागोंदी कारभाराचाच हा सारा परिणाम आहे असेही त्यांनी म्हटले आहे.