नवी दिल्ली – पाकिस्तानच्या निवडणूकीच्या निकालाला आव्हान देण्यासाठी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेल्या तब्बल ३० याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. आपली तक्रार या उमेदवारांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगासमोर मांडाव्यात, असे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अनेक मतदार संघांमध्ये पीएमएल-एन च्या उमेदवारांविरोधात असलेल्या अपक्ष उमेदवारांना अधिक मते मिळाली होती. मात्र पीएमएल-एनचे हे विजयाचे निकाल ढोंगीपणातून फिरवण्यात आल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे उमेदवारांच्या अनुपस्थितीत निकाल तयार केला होता, असे या उमेदवारांचे म्हणणे होते.
पीटीआयने या निवडणुकीमध्ये १७० जागांवर विजय मिळवला असून निवडणूकीतील ऐतिहासिक गैरप्रकारांमध्ये ८० पेक्षा जास्त जागांचे निकाल पीएमएल-एन च्या बाजूने फिरवण्यात आल्याचा दावा पीटीआयच्या वकिलांनी केला आहे. या गैरप्रकारांच्याविरोधात कायदेशीरलढाई लढण्यास पीटीआय तयार आहे आणि हिरावून घेतलेल्या जागा परत मिळवण्याची तयारी देखील असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
निवडणूक आयोगाने काही तासांसाठी मतमोजणी थांबवली होती. मतमोजणी सुरू असताना अचानक मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा रक्षक तैनात केले गेले होते. त्यानंतर या मतमोजणीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप व्हायला लागला आहे.