सांगली – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी मोठं वक्तव्य केले आहे. त्यांचं हे वक्तव्य सत्तेत असलेल्या शिवसेनेसंदर्भात आहे. या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझं वैयक्तीक मत नसून राष्ट्रीय मत असल्याचं भिडे यांनी म्हटले. सांगली येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
संपूर्ण देशात शिवसेना वाढवावी अशी इच्छा बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचे काम हयात असलेल्या लोकांनी करणे गरजेचं आहे. रेल्वे स्टेशन चौकाचे नामकर होईलच. मात्र सांगली शहरात 200 ते 250 शिवसेनेच्या शाखा का नाहीत. याचे तीव्र दु:ख आहे. याचा विचार करून आपण सर्वांनी काम केले पाहिजे. हेच खरे नामाकरण ठरणार आहे. हा प्रवाह अखंड चालू राहिला पाहिजे’ अशी इच्छा भिडे यांनी बोलून दाखवली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे छायाचित्र नोटांवर छापण्याचे ताकद असलेला देश आपल्याला घडवायचा आहे. हे लक्षात ठेवून काम आपल्याला करायचे आहे. हे काम शिवसेनेच्या कार्यातच होणे शक्य आहे, हे माझे ठाम मत असल्याचे भिडे म्हणाले.
‘या देशाला शिवसेना अत्यंत गरजेची आहे. देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कामावर आपण तुटून पडले पाहिजे. काम वाढवूया, लोकांमध्ये जाऊया, हे माझं वैयक्तिगत मत नाहीतर राष्ट्रीय मत आहे, असंही संभाजी भिडे यांनी ठणकावून सांगितले.