इंदूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज येथे आयोजित करण्यात आलेल्या 17व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, प्रवासी भारतीय हे परदेशी भूमीवर भारताचे “ब्रॅंड ऍम्बेसेडर” आहेत. प्रवासी भारतीय भारताच्या योग, आयुर्वेद, कुटीर उद्योग, हस्तकला आणि बाजरीसारख्या भरड धान्याचे ब्रॅंड ऍम्बेसेडर आहेत असे आम्ही मानतो असे ते म्हणाले. देशाच्या भावी वाटचालीत या प्रवासी भारतीयांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. विदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांची पुढची पिढीही त्यांच्या पालकांच्या मूळ देशाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की ज्या राज्यात हे संमेलन भरले आहे त्या राज्यात अनेक नैसर्गिक महत्वाची स्थळे आहेत. उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर, नर्मदा नदी आणि नुकत्याच विकसित झालेल्या महाकाल लोक या ठिकाणांनाहीं या विदेशस्थ भारतीयांनी भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
Addressing the Pravasi Bharatiya Divas Convention in Indore. The Indian diaspora has distinguished itself all over the world. https://t.co/gQE1KYZIze
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2023
प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या 17 व्या आवृत्तीचे आयोजन करणाऱ्या इंदूरचे कौतुक करताना मोदी म्हणाले, इंदूर केवळ स्वच्छतेचीच नाही तर आपल्या वारशाचीही काळजी घेत आहे. इंदूरचे स्वादिष्ट पदार्थ तोंडाला पाणी आणणारे आहेत आणि जे लोक त्यांचा एकदा स्वाद घेतात ते कधीही इतर कशाकडे वळणार नाहीत असे त्यांनी नमूद केले.
सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिकापरसाद संतोखी,हे या उद्घाटन सोहोंळ्यात प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले की, भारत प्रादेशिक आणि जागतिक व्यासपीठावर एक विश्वासार्ह भागीदार असल्याचे सिद्ध झाले आहे. सूरीनामने कॅरिबियन देशात हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी संस्था स्थापन करून वैद्यकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासह विविध क्षेत्रात भारताशी भागीदारी करण्याची तयारी दर्शवली आहे. गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महामारीच्या काळात जागतिकीकरण अयशस्वी झाले तेव्हा मोदींनी ते अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. विविध देशांना कोविड लस आणि औषधे पुरविण्यात भारताने केलेल्या मदतीचेही त्यांनी कौतुक केले.
गयानाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.