नवी दिल्ली- सध्या भारतात प्रचंड प्रमाणात विस्तारलेल्या वाहन उद्योगाचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान 7.1 टक्के आहे. यात वाढ होण्यास भरपूर वाव असून या उद्योगाचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान 12 टक्क्यांपर्यंत नेण्याचे संकल्प सरकारने केला आहे.
वाहन उद्योगाचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान 7.1 टक्क्यांवरून 12 टक्के केले तर या क्षेत्रामधून पाच कोटी रोजगार निर्माण होणार आहेत. सध्या या क्षेत्रात 3 कोटी 70 लाख रोजगार निर्माण झालेले आहेत.
भारताने पाच वर्षांमध्ये पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे ठरविले आहे. वाहन उद्योगाच्या विकासाशिवाय हा संकल्प पूर्ण होणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी वाहन उत्पादकाच्या संघटनेशी चर्चा करताना सांगितले.
भारताच्या एकूण मॅन्युफॅक्चरिंगमधील वाहन उद्योगाचे योगदान तब्बल 49 टक्के आहे. या उद्योगाची उलाढाल 7.5 लाख कोटी असून या उद्योगातून 3.5 लाख कोटी रुपयांची निर्यात केली जाते. यावरून या उद्योगाचा भारतातील आवाका लक्षात येतो. भारतामध्ये जगातील बहुतांश वाहन उद्योग कार्यरत आहेत. आगामी काळात आपण प्रयत्न केले तर भारतातील वाहन उद्योग जगातील पहिल्या क्रमांकाचा होऊ शकेल. सध्या भारतातील वाहन उद्योग जगातील चौथ्या क्रमांकाचा आहे असे गडकरी यांनी सांगितले.