नवी दिल्ली- आगामी काळात साखरेचे उत्पादन काही प्रमाणात कमी होणार आहे. साखरेसाठी लागणाऱ्या उसाचा वापर इथेनॉल निर्माण करण्यासाठी वाढणार असल्यामुळे हा परिणाम होणार असल्याचे केंद्रीय अन्न सचिव सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले.
ब्राझीलनंतर भारत जगातील साखर उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारत आपल्या गरजेपेक्षा जास्त साखर निर्माण करतो. त्यामुळे साखरेला भाव मिळत नाही. यासाठी इथेनॉल निर्मिती वाढविण्यावर सरकारने भर दिला आहे.
त्यामुळ इथेनॉल निर्माण होण्याबरोबरच साखरेचे अतिरिक्त उत्पादन टळते. सिंह यांनी सांगितले की, इथेनॉलचे उत्पादन केले नसते तर साखरेचे 31 दशलक्ष टन इतके उत्पादन झाले असते. मात्र आता त्याऐवजी साखरेचे 30.50 दशलक्ष टन एवढे उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षी दोन दशलक्ष टन उसापासून इथेनॉल तयार करण्यात आले होते. आता हे प्रमाण वाढवून 3.5 दशलक्ष टन करण्यात आले आहे.