सागरिका खिडकीतून एकटक रस्त्यावरची गर्दी न्याहाळत होती. वाहनाचे ते कर्णकर्कश्य हॉर्न जोरजोरात वाजत होते.त्यांचा मन बधिर करणारा आवाज तिच्या कानांपर्यंत पोहचत होता खरा तरीही तिच्या मनातील विचारांच वादळ मात्र भंग करू शकत नव्हता. कालपासून तिला एकच प्रश्न सारखा सतावत होता. नक्की मैत्री म्हणजे काय? हीच का सागरची इतक्या वर्षांची मैत्री? आईकडून कृष्ण -सुदामा सारख्या मैत्रीच्या अनेक गोष्टी ऐकूनच ती मोठी झाली होती. त्यामुळे तिला नेहमी वाटायचं की आपली कधी झालीच कुणाशी मैत्री तर ती श्रीकृष्ण सुदामा सारखी अगदी घट्ट असावी.अगदी तसंच हवं तसं मैत्र सागरच्या रूपात तिला लाभलं होतं आणि ह्याच दहा वर्षांच्या सागर व तिच्या मैत्रीचा चित्रपट तिच्या मन पटलावर चालू झाला होता.
आपल्याला चित्रकलेची तशी लहानपणापासून आवड होती. पण प्रयत्न करूनसुद्धा हवी तशी चित्र काही आपल्याला काढता आली नाहीत. चित्र काढायला बोटं वळतच नव्हती. पण दुसरं कुणी छान चित्रं काढलेले पाहून कौतुक करायला जीभ मात्र बोलायला वळत असायची हेही तितकंच खरं इतरांचं कौतुक करताना आपण कधी थकलोच नाही. दुसऱ्यांनी काढलेली उत्तम चित्र पाहण्यात बालपण, तारुण्य कधी सरून गेलं कळलंच नाह. आणि पुढे जाऊन घर संसार ऑफिस हेच आयुष्याचं चित्र होऊन गेलं.
असं रोजचं रुटीन चालू असताना एक दिवस लंच घेत असताना राधिका अचानक म्हणाली, अगं सागरीका, तुला सांगायचे राहिले. चित्रकार सागरच्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्वला भरले आहे. जायचे का आपण पाहायला? मी पाहिले आहे, तू अजून पाहीले नाही ना? चल, आज ऑफीस सुटल्यानंतर जाऊ. मलाही ‘ब्रेकची’ खरी गरज भासत होती आपण तात्काळ होकार दिला होता संध्याकाळी चित्र प्रदर्शन पाहण्याचा कार्यक्रम पक्का झाला होता. बालगंधर्वला ठरल्या प्रमाणे चित्र प्रदर्शन पाहायला आम्ही गेलो होतो. राधिकाची सागरशी तोंड ओळख होती. सागरने काढलेलं एक एक चित्र आपण तन्मयतेने पाहत होतो. चित्र पाहून मनातल्या मनात सुखावत होतो. बाजूलाच फॅन्सच्या घोळक्यात सागर उभा होता. राधिका माझा हात धरून जरा ओढतच सागर जिथं उभा होता तिथं घेऊन गेली. ही माझी मैत्रीण सागरीका हिला देखील चित्रकलेची खूप आवड आहे. आणि दोघांत संवाद सुरू झाला…
हाय… तोही हाय, म्हणाला.
आवडली का तुम्हाला मी काढलेली चित्र?
मग काय विचारता. आपण पाहिलेल्या त्या – त्या चित्राबद्दल सागरशी बोलू लागलो होतो. सागरात काय काय दडलेलं असतं. सागराची गेहराई तुमच्या चित्रात दिसते… कुठल्या चित्रात काय वाटलं. कसं आहे… इत्यादी…
त्यालाही ते मनापासून आवडलं. आपल्या चित्रांविषयी कुणी इतकं भरभरून बोलतं हे आवडणारंच असू शकतं. संवाद संपताना एकमेकांना मोबाइल नंबरची देवाण घेवाणसुद्धा झाली. त्या नंतर पुढच्या महिन्यात परत प्रदर्शन भरलं. सागरने आग्रहाने फोन करून आपल्याला बोलावलं होतं. राधिकामुळे एक चांगला संवेदनशील माणूस मित्र म्हणून मिळाला होता. मैत्रीला वयाचा बंधन नसतं हेच खरं!
पुढे जाऊन जणू एक नियमच झाला. जिथं सागरचे प्रदर्शन तिथं सागरीकाची हजेरी असायचीच. कधी कधी तर ऑफिसला दांडी मारूनच जायचो. एका एका चित्रावर चर्चा करायचो. हे चित्र काय बोलतं. हा रंग काय सांगतो. जणू सागरने काढलेले चित्र सागरीकाच्या मुखातून बोलायचं! गेली दहा वर्षं हेच चालू होतं. ह्या दहा वर्षांत खूप बदल झाले. सागरने आपल्या कलेत खूप नाव कमावलं होतं. तो जगप्रसिद्ध चित्रकार झाला होता. आपलाही कामाचा व्याप दिवसेंदिवस खूप वाढला होता. त्याची देशात-परदेशात होणारी प्रदर्शन. त्यात तो गुंतून पडला होता. असे नाही की तो आपल्याला विसरला होता अधून मधून वेळ मिळेल तेव्हा तो बोलत असायचा. अर्थात त्याने मिळवलेल्या यशाचा आनंद होतच असे. या दाट मैत्रीची वर्ष कधी सरली कळलंच नाही.
योगायोगाने या मैत्रीला ज्या दिवशी दहा वर्षं पूर्ण होणार होती. अगदी त्याच दिवशी सागरच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरणार होतं .नामवंत मंडळी हजेरी लावणार होती.. आपल्या मनात त्या दिवसाच्या किती कल्पना होत्या. जणू आपल्यासाठी साजरा होणारा मोठा सणच… कदाचित सागरला नसेल तेवढा उत्साह आपल्याला होता तो दिवस कधी उगवतो असे आपल्याला झाले होते. आणि अखेर तो दिवस उगवला. भराभरा आवरुन. ताज्या फुलांचा गुच्छ. छानसं गिफ्ट चितळेंची आंबा बर्फी, बाकरवडी घेऊन आपण इप्सीत स्थळी पोचलो. बरीच गर्दी होती. वाह, सुंदर, अप्रतिम क्या बात है. असेच कानाला ऐकू येत होते. आपणही ती चित्र कौतुकाने पाहत होतो.खरेच सारी चित्र संवेदना जागृत करणारी होती. प्रत्येक चित्रांची भाषा वेगळी. कुठलंच चित्र एक सारखं नव्हतं. खरी खुरी जिवंत वाटणारी चित्र पाहणाऱ्या सर्वांशी जणू मूक संवाद साधत होती. अनेक प्रदर्शनात नेहमी दिसणारे थोडे ओळखीचे चेहरे दिसत होते. कुणी हसत होते तर कुणी हात मिळवत होते. पण ज्याला डोळे शोधत होते तो सागर नजरेस दिसत नव्हता. भेटीसाठी आतुर झालेल्या मनाला कसंबसं समजावं लागत होतं. शेवटी न राहून ओळखीच्या माणसांना विचारलं कीसागर कुठे दिसत नाही, कुठे गेला आहे. तेव्हा कुणीतरी सांगितले तो फॅन्सच्या गराड्यात आहे.
बराच वेळ वाट पाहून झाल्यावर लांबून सागर येताना दिसला. एकदाचा जीव भांड्यात पडला! त्याला पाहून खूप आनंद झाला. आजूबाजूला भरपूर गर्दी होती. त्याला ऐकू जाईल. अशाच आवाजात आपण सागरला साद घातली होती त्यानेही वळून पाहिलं पण तो तसाच पुढे निघून गेला. बहुदा अजून बरेच जण आपल्यापेक्षा जवळचे असतील. कदाचित आपणच या मैत्रीला मनासारखा आपल्याला हवा तसाच आकार दिला. जरा आपलं चुकलंच उगाच भावनेच्या आहारी जाऊन मैत्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. स्वतःची झालेली चूक लक्षात येताच आपण मैत्रीला अजून चांगली मिठास आणणाऱ्या गोड खाऊ, गिफ्ट गुच्छासह काढता पाय घेतला होता. निघताना तिचं मन खूप जड झालं होतं…
मुग्धा भिडे