पुणे – राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत पारा आणखी घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात 15 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा परिणाम उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात होणार असून, गारठा आणखी वाढणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला असून, अनेक जिल्ह्यांचे तापमान 8 अंशाखाली नोंदवले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान सरासरीच्या खाली नोंदवले आहे. तर मुंबईसह किनारपट्टीवर तापमान सरासरी जवळ नोंदवले आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान गुरुवारी जळगाव जिल्ह्यात 7 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. तर औरगांबाद, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात देखील तापमान 10 अंशाखाली नोंदवले आहे.
पुणे 8.3 अंश –
शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट झाली असून, या हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद मंगळवारी झाली आहे. सलग चौथ्या दिवशी तापमान 10 अंशाखाली नोंदवले आहे. शुक्रवारी शिवाजीनगर केंद्रात 8.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अन्य शहरांतील मंगळवारचे तापमान
जळगाव – 7
पुणे – 8.3
नाशिक – 9.2
औरंगाबाद – 9.4
उस्मानाबाद – 10.4