weather news – काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला होता. तसेच मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात थंडी अनुभवायला मिळत आहे.
मात्र आता हे वातावरण बदलणार असून राज्यात लवकरच उन्हाचा चटका वाढणार आहे. पुढील काही दिवसात आता राज्याच्या तापमानात वाढ होत उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मार्च महिना हवामानाच्या हिशेबाने अत्यंत विचित्र राहण्याचा अंदाज आहे. साधारणत: याच महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र, याच वर्षी याच महिन्यात हवामान अस्थिर राहू शकते. मार्चमधील पुढील तीन आठवड्यांमध्ये रात्री उष्ण आणि दिवसा सामान्य तापमान राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, उत्तर भारतात लागोपाठ पश्चिमी चक्रवात येत असल्याने काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेशात जोरदार वारा, पावसासह हिमवृष्टी होणार आहे. महाराष्ट्रात वातावरण कोरडे राहणार असल्याने पहाटे गारवा जाणवणार असून दिवसा उकाडा जाणवणार आहे.
तसेच मार्चच्या अखेरीस ३ ते ५ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्येही उन्हाळा आणखी तीव्र होत असल्यामुळे दुपारच्या वेळी काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक
पूर्व विदर्भापासून कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होते. आज तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर सध्या तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३५ अंशांहून अधिकच असल्याचे पाहायला मिळत आहे.