इटानगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या विविध भागात असलेल्या ईशान्येकडील नागरिकांना वर्णद्वेषी वागणूक दिली जात आहे अशी तक्रार अरूणाचल प्रदेशातील कॉंग्रेस आमदाराने पंतप्रधानांना पत्र पाठवून केली असून हे प्रकार रोखण्याची सूचना त्यांनी पंतप्रधांना केली आहे. या नागरिकांचा उल्लेख करोना किंवा व्हायरस अशा शब्दात केला जात असून त्यांना भारताच्या विविध भागात अत्यंत भेदभावाची वागणूक मिळत असल्याचे आमदार निनॉंग ईरिंग यांचे म्हणणे आहे.
या अनुषंगाने घडलेल्या विविध घटनांचे दाखलेही त्यांनी या पत्रात दिले आहेत. नॉर्थवेस्ट दिल्लीतील विजयनगर मध्ये एका मणिपुरी महिलेच्या अंगावर तेथील काही नागरिक थुंकले आणि त्यांनी या महिलेला करोना म्हणून हिणावले. हैदराबाद मधे ईशान्येकडील दोन विद्यार्थ्यांना सुपर मार्केट मध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचा दाखलाही त्यांनी दिला आहे.ईशान्य भारतातील नागरिकांच्या चेहेऱ्याची ठेवण चिनी नागरिकांसारखी असल्याने त्यांच्या विषयी गैरसमज करून घेऊन त्यांना अशी वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांना पत्र पाठवणारे कॉंग्रेसचे हे आमदार माजी केंद्रीय मंत्री आहेत. ऑल अरूणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियनेही ईशान्येकडील नागरिकांना मिळत असलेल्या वागणुकीचा निषेध केला आहे.