सातारा – वाई तालुक्यातील खानापूरचा युवक अभिषेक रमेश जाधव (वय 30) याचा परखंदी गावाच्या शिवारात खून झाल्याचे आढळल्यानंतर आज सकाळी वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायंकाळनंतर पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
परखंदी येथे मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वाई पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांच्यासह पोलीस दाखल झाले. प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही घटना कळताच खानापूरमध्ये तणावाचे वातावरण झाले असून तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, परखंदी गावातील काही नागरिक शेताकडे जाताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब लगेच वाई पोलिसांना सांगितली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करताना मृतदेहाजवळील काही कागदपत्रावरून युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठवण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून खानापूर येथे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. तेथेही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अद्याप या खून प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे तपास करत आहेत.