वेल्हे – भोर, वेल्हे तालुक्यातून जाणाऱ्या नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळदपासून कर्णवडी, रानवडीमार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग 106 हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून या रस्त्याचे काम त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर-वेल्हे तालुक्यांतील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. महाड, रानवडी, कर्णवडी, मढेघाट, केळद, पासली, भट्टी, वेल्हे,
आंबवणे, नसरापूर, चेलाडी फाटा राज्य मार्ग 106 हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 48 पुणे-बंगळूर हायवे व राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई-गोवा हायवे या दोन महामार्गांना जोडणारा असून, पुण्याहून कोकणला जाणारा सर्वात जवळचा मार्ग असून नसरापूर येथील महामार्ग क्र. 48 महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल तयार आहे.
वेल्हे व भोर हे तालुके छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तालुके असून, या परिसरात ऐतिहासिक साक्ष देणारे गडकोट, घाटमाथे, बनेश्वर, अमृतेश्वर, किल्ले राजगड, तोरणा, लिंगाणा, आदी वास्तू, किल्ले आणि देवस्थाने येथे आहेत. त्यामुळे गडकोटांना आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणाऱ्या गडप्रेमी आणि अभ्यासक तसेच पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे.
याबरोबरच वेल्हे तालुका हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेता या भागातून जाणारा महामार्ग विकसित केल्यास या परिसरातील दळणवळण वाढेल. या परिसरातील पर्यटनास चालना मिळेल, तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. असे सुळे यांनी सांगितले.