सातारा – ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून आदर्श शाळा निर्मिती उपक्रम राबविण्यात येत आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा राज्यातील इतर जिल्ह्यांना आदर्शवत ठरतील असे तयार करा, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेमधील सभागृहात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान व आदर्श शाळा निर्मितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे आदी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानांतर्गत 17 केंद्रांची निवड करण्यात आली आहे.
येत्या जूनपर्यंत दहा स्मार्ट केंद्रे तयार करा, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या. 17 केंद्रे स्मार्ट करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दिलेल्या निधीचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. स्मार्ट केंद्रांमध्ये सोलर एजर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आयुष हर्बल गार्डन याच्या निर्मितीबरोबर अभियानासाठी जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद स्वनिधी, सीएसआर, राष्ट्रीय आरोग्य अभियान यासह विविध योजनांच्या निधीचा वापर करुन करावा,अशी सूचना त्यांनी केली. जिल्हा परिषदेच्या 56 शाळा आदर्श करण्यात येणार आहेत.
यामध्ये मुलांना अत्याधुनिक शिक्षण मिळण्यासाठी मॉडेल तयार करून ते पूर्ण जिल्ह्यात वापरावे, असेही त्यांनी सांगितले. आदर्श शाळेसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी दिला जाईल. या उपक्रमासाठी सीएसआर फंड व लोकसहभागही घ्यावा. प्रामुख्याने विज्ञान व गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, परिसर सुशोभीकरण, ई- लर्निंग यांसह विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्ह्यात दहा ई- लर्निंग स्टुडिओ उभारण्यात येणार असून यासाठी अंदाजे दहा ते बारा लाखापर्यंतचा खर्च येतो. हे स्टुडिओ इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी तयार करावे. या स्टुडिओला तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा जोडाव्यात. यासाठी संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणही द्यावे, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.