मागील आठवड्याच्या तुलनेत दुप्पट आवक; भावात 15 ते 20 टक्क्यांनी घसरण
पुणे – गोड, आंबट चवीचे बोर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळविभागात बोरांची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी दुप्पट आवक झाली. त्यामुळे भावात 15 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत भाव निम्मेच झाले असल्याची माहिती व्यापारी रवींद्र शहा आणि परेश शहा यांनी दिली.
मागील आठवड्यात सुमारे दीड हजार पोती आवक होत होती. ती रविवारी अडीच ते हजार जुडी आवक झाली. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, अनगर, रोपळे, खंडाळी, कोन्हेरी या भागातून आवक होत आहे. ढगाळ वातावरणामुळे ही आवक वाढली असल्याची माहिती रवींद्र शहा यांनी दिली. ते म्हणाले, आवकच्या तुलनेत शहर आणि परिसरातून मागणी कमी आहे. त्यामुळे भाव उतरले आहेत.
विशेषत: गुजरात येथील अहमदाबाद, गांधीनगर आणि भावनगर येथून जास्त मागणी आहे. तिकडे मोठ्या प्रमाणात बोरांची निर्यात होत आहे. याबरोबरच महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा या पर्यटनस्थळ भागातून आणि जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, खेड, राजगुरूनगर, चाकण परिसरातून बोरांना मागणी आहे. तर परेश शहा म्हणाले, फेब्रुवारी अखेरपर्यंत बोरांचा हंगाम सुरू राहणार आहे. लांबलेल्या पावसाचा बोरांवर कसलाही परिणाम झालेला नाही. दर्जेदार माल बाजारात येत आहे. नागरिकांकडून आंबट-गोडमध्ये चेकनेटला जास्त मागणी असते. तर, गोडमध्ये चमेली बोर खाण्यास लोक पसंती देतात. येत्या काळात बोराची आवक आणखी वाढून भावात घसरण होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.