पुणे – यंदा एल निनो समुद्र प्रवाहामुळे मान्सूनचा पाऊस घटण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. त्याचा धसका सरकारी यंत्रणांनी घेतला असून, पाण्याचे योग्य ते नियोजन करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे 31 ऑगस्टपर्यंतचे नियोजन करण्यासाठी येत्या मंगळवारी (दि. 18) महापालिका आणि पाटबंधारे विभागाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पाण्याचे नेमके नियोजन कसे करायचे यावर चर्चा होणार आहे.
दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने यापूर्वीच पाटबंधारे विभागाकडे ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी 7. 94 टीएमसी पाण्याची मागणी केलेली आहे. यावरही या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत आजअखेर सुमारे 12.50 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या काही वर्षात राज्यात मान्सून वेळेवर आला तरी खडकवासला धरण साखळीत जुलै महिन्यातच पावसाला सुरुवात होत असल्याने उपलब्ध पाणी 15 जुलैपर्यंतच राखीव ठेवले जाते. परिणामी सध्या धरणात असलेले पाणी महापालिका तसेच जिल्ह्यातील सिंचनाचे उन्हाळी आवर्तन तसेच पाणी पुरवठ्यासाठी पुरेल एवढे आहे. मात्र, या वर्षी एल निनो समुद्र प्रवाहामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे, पाऊस लांबल्यास अथवा कमी झाल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना शहराला करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने आतापासून पाणी वापर कमी करण्यासह उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका तसेच पाटबंधारे विभागाला दिले असून, त्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे.
महापालिकेला गांभीर्य नाही
धरणातील पाणी वेगाने कमी होत असताना, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरीही शहरात पाण्याचा बांधकाम, हॉटेल तसेच व्यावसायिक ठिकाणी स्वच्छतेच्या कामासाठी होणारा वापर, पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे चोरुन विकणे, महापालिकेच्या कामांसाठी चोरुन पाणी वापरणे, वॉशिंग सेंटर, स्वच्छतागृहांमध्ये पिण्याचे वापरले जाणारे पाणी, उद्याने तसेच शासकीय कार्यालयांमध्ये गळक्या नळांमुळे वाया जाणारे पाणी हे रोखणे आवश्यक आहे. महापालिकेकडून याबाबत काहीच हालचाल केली जात नाही. पाणीबचत करण्यासाठी या उपाययोजना महत्वाच्या असताना; महापालिका मात्र, शहरातील मोठ्या जलवाहिन्यांची गळती रोखण्यात मग्न आहे. दुसऱ्या बाजूला गळती सापडली तरी सण, उत्सवामुळे गळती रोखण्यासाठी जादा दिवस पाणी बंद ठेवण्यासाठी पालिका तयार नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी अनावश्यक कामांसाठी वापरले जात असताना महापालिकेस त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.