सातारा – सातारा शहरासह जिल्ह्यातील काही गावांना आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले. वाई तालुक्यातील मांढरदेव, तसेच वेटणे, रणसिंगवाडी, उंबरमळे, कटगुणसह पुसेगाव परिसराला गारा पडल्या. शेतातील ताली फुटून मोठे नुकसान झाले आहे. सातारा शहरात अवकाळीने शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा मेघगर्जना करता विजांच्या लखलखाटात सुरुवात केली. पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या पावसाने सातारकरांची चांगलीच पळापळ झाली. सातारा तालुक्यातील काही गावात पाऊस झाल्याने गहू, हरभरा काढणीची कामे खोळंबली आहेत. गेल्या दोन दिवसापासून अवकाळीच्या पावसाचे आगमन अचानक होत आहे.
दिवसा उकाडा जाणवत असून सायंकाळी मेघगर्जना करत पाऊस सुरू होत आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाचे चित्र झाले होते. पाऊस येण्याचे संकेत मिळाल्याने पदपथ विक्रेत्यांनी आपली दुकाने आवरली. मात्र, लगेच वातावरण बदलले. पुन्हा सायंकाळी 7 वाजता शहरातील पोवई नाका, शाहूनगर, एसटी स्टॅंड, सदरबाजार, केसरकर पेठेत पावसाने सुरुवात केली. तालुक्यातील लिंब,किडगाव, नेले या भागातही किरकोळ पाऊस झाला. त्यामुळे पावसाने उन्हाळी गहू, हरभरा काढण्याचे काम रखडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पुसेगाव परिसरात फटका
पुसेगाव (प्रतिनिधी)- मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारांचा जबरदस्त मारा व सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आज शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा वेटणे, रणसिंगवाडी, उंबरमळे, कटगुणसह पुसेगाव परिसराला जबरदस्त फटका सोसावा लागला आहे. शिवारातील ओढ्यांना पूर आला तर शेतातील ताली फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर बुध, राजापूर गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सध्या रब्बीची सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांच्या काढणीत शेतकरी वर्ग मग्न आहे. मात्र, पुसेगाव, वेटणे,रणसिंगवाडी, कटगुण परिसरातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने गहू, मका, ज्वारी, हरभरा ,कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. मोहराने बहरलेल्या आंब्याच्या फळबागांनाही फटका बसला आहे. जोराचा गारांचा मारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगले उत्पन्न हाती येण्याचे स्वप्न भुईसपाट झाले.
दरम्यान, अचानक सुरू झालेल्या पावसाने कांद्याच्या ऐरणीत पाणी शिरले तर उपटून पडलेल्या ज्वारीचा कडबा भिजून चिंब झाला आहे. गहू, हरभरा यासारखी काढलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबातील सदस्यांना हाताशी धरून लगबग सुरू होती. याच हंगामात शेतकरी वर्ग आपल्या कुटुंबाला पुरेसं एवढं ज्वारी, गहू, हरभरा हे धान्य घरात साठवून ठेवतो आणि उरलेलं विकून चार पैसे त्यांना मिळत असतात. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुसेगाव, वेटणे, रणसिंगवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टीवर थापलेल्या विटा तसेच तयार विटा पावसाने खराब होऊन लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकाची कृषी विभागातर्फे पाहणी व पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.