हुबळी – भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना तिकीट नाकारले असल्याचे वृत्त आहे. त्यावर शेट्टर यांनी आता जाहीर नाराजी व्यक्त करणे सुरू केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपले तिकीट कापण्यात आले तर भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. किमान 20 ते 25 मतदारसंघांतील भाजपच्या विजयावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो, असे शेट्टर यांनी म्हटले आहे. आज येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मी रविवारपर्यंत पक्षाकडून अनुकूल निर्णय होईल की नाही याची वाट पाहणार आहे. त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेन.
हुबळी धारवाड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. पण त्यांना अजून पक्षाने तिकीट जाहीर केलेले नाही. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचा निरोप पक्षाकडून त्यांना कळवण्यात आला होता. मात्र अजून भाजपने तेथील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अशी वर्तणूक कशी काय दिली जाऊ शकते, याचा भाजपने विचार केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मला उमेदवारी दिली नाही तर त्याचा 20 ते 25 मतदारसंघांवर परिणाम होऊ शकतो,
असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही म्हटले आहे, असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. मला तिकीट नाकारल्याने हुबळी धारवाड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामे देऊ केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. शेट्टर यांना काही दिवसांपूर्वी पक्षाकडून फोन आला होता व त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची सूचना करण्यात आली होती. पण आपण ही सूचना मान्य केली नाही व त्या बाबतीत आपण आपली नाराजीही पक्षाला कळवली आहे, असे ते म्हणाले.