नगर -जिल्ह्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. यात नगर शहर, एमआयडीसी आणि उपनगरला गारपिटीने झोडपून काढले. तर उर्वरित जिल्ह्यात सहा मंडळात अवकाळी बरसला असून यात सर्वाधिक कर्जत तालुक्यातील कोंभळी महसूल मंडळात 48.5 मिली मीटर तर नगर तालुक्यातील जेऊर मंडलात 39.8 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. मागील अवकाळीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप शासनाची मदत मिळालेली नसतांना अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. शुक्रवार ते रविवारी पुन्हा जिल्ह्यात काही तालुक्यातील 50 गावांना अवकाळी आणि गारपिठीचा दणका बसला. यात सर्वाधिक नुकसान हे नेवासा तालुक्यातील 29 गावातील 8 हजार 400 शेतकऱ्यांचे 4 हजार 300 हेक्टरवरील शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या खालोखाल शेवगाव तालुक्यातील 14 गावात 3 हजार 673 शेतकर्यांच्या 2 हजार 197 हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे.
यासह पारनेर तालुक्यातील पाच गावात 397 शेतकऱ्यांचे 180 हेक्टरवरील पिकांचे, कोपरगाव तालुक्यातील एका गावात 1 शेतकऱ्यांचे 0.83 हेक्टरवरील आणि नगर तालुक्यातील एका गावात 12 शेतकऱ्यांचे 7 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने शनिवारी केलेल्या प्राथमिक पंचानाम्यानूसार ही आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात 97 महसूल मंडळापैकी सहा महसूल मंडळात दमदार पावसाची नोंद झाली आहे. यात सावेडी मंडळात 17.5 मिली मीटर, नागापूर 14 मिली मीटर, जेऊर 39.8 मिली मीटर, कोंभळी 48.5 मिली मीटर, धांदळफळ 17.8 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे.
मांजरसुंबा, पिंपळगाव, डोंगरगण मध्ये कांदा पिकांचे नुकसान
जिल्ह्यात शनिवार पुन्हा वांबोरी, डोंगरगण, पिंपळगाव, मांजरसुंबा, जेऊर यासह परिसारातील गावात जोरदार पाऊस झाला. महसूल आणि स्थानिक ग्रामपंचायातीकडील पर्जन्यमापक यंत्रात या पावसाची नोंद झालेली आहे. वास्तवात या गावातील अनेक ठिकाणी उघड्यावर काढून पडलेल्या कांदा पिक पावसात भिजले असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.