पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे : सार्वजनिक गणेशोत्सव बैठक
तळेगाव दाभाडे – गणेशोत्सव मंडळांनी अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. “डीजे’, “डॉल्बी’चा उपयोग करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत. वर्गणी घेताना जबरदस्ती करू नका खंडणीचे गुन्हे दाखल होतील, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले. तसेच गणेशोत्सव मंडळाने नियमानुसार वीज जोडणी घ्यावी. गणेशोत्सव मंडळांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. दर्शनासाठी महिला व पुरुष रांगा वेगळ्या करा. अग्निशमन यंत्र उपलब्ध ठेवा, देखाव्याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे, अशा सूचना वाघमोडे यांनी मंडळांना दिल्या.
तळेगाव येथील योगीराज कार्यालयात सोमवारी (दि. 26) सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. या वेळी नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसेवक अमोल शेटे, अरुण माने, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, महिला दक्षता समिती अध्यक्ष रजनी ठाकूर, पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस निरीक्षक गुन्हे शहाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस कर्मचारी प्रशांत वाबळे, युवराज वाघमारे, राकेश पालांडे, मंडळाचे, विविध समिती, संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे पुढे म्हणाले की, जे गणेशोत्सव मंडळ गणपती बसविणार आहेत, त्यांनी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणेही सुरू झाले आहे, यामध्ये नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडळांचा स्टेज भक्कम असावा, विद्युत तारा या वरती खांबांना बांधलेल्या असाव्यात, पारंपारिक वाद्य वाजवूनच गणपतीची मिरवणूक व विसर्जन करावे. गणपती मंडळामध्ये मंडळाचे कार्यकर्ते हजर असावेत, अधिक माहितीसाठी गणपती मंडळ आणि पोलिसांचा व्हॉटस् ऍप ग्रुप तयार केला जाईल. कोणत्या मंडळाला काही समस्या असेल, तर त्यांनी ती ग्रुपवर टाकल्यास लगेच समस्येचे निवारण केले जाईल.
नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अरुण माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन आणि महत्वाच्या सूचना सांगितल्या.
वीज मंडळाचे उप कार्यकरी अभियंता राजेंद्र गोरे यांनी गणेश मंडळांना वीज पुरवठा विषयी माहिती दिली. यामध्ये मंडळांनी अन्य कोणत्याही ठिकाणाहून वीज न घेता स्वतः मंडळाचे कनेक्शन घेण्यास सांगितले. यावेळी ही वीज सर्व मंडळांना अल्पदरात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. शहाजी पवार यांनी आभार मानले.