मुंबई – मी संपूर्ण देशात फिरुन मायानगरी मुंबईत २०४७ चे स्वप्न घेवून आलो आहे. त्यामुळे, तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की, या निवडणुकीत जुने सर्व विक्रम मोडीत निघणार आहेत. देशाचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत बसलेल्या नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीने राहुल गांधी या पुढे कधीच सावरकरांचा अपमान करणार नाहीत, असे वाक्य त्यांच्या तोंडून वदवून घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना केले.
ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. या सभेत पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच यावेळी, व्यासपीठावर मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रिपाईचे रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेतेमंडळी उपस्थित होते.
मोदी पुढे म्हणाले, मुंबई केवळ स्वप्न पाहत नाही, तर ते जगते देखील. या स्वप्नाच्या नगरीमध्ये मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यात मुंबईची सर्वांत मोठी भूमिका असेल. मुंबई गतीला सर्वांत जास्त ओळखते. जगभरातील अनेक देश आपल्या पुढे निघून गेले. मात्र, आधीच्या सरकारचा आपल्या नागरिकांवर विश्वास नव्हता. येत्या काही वर्षात मी पुन्हा तुमच्याकडे येईल, तेव्हा आपण तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होऊ. यासह मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाणार असल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
– जगातील कोणतीच ताकद पुन्हा कलम 370 परत लागू करत नाही
– तिहेरी तलाकलाच आम्ही तिन तलाक दिला
– काँग्रेसने 60 वर्ष केवळ गरिबी हटवण्याची चर्चा केली
– देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईला मिळणार
– देशात फिरूण आलोय, यावेळी सर्व जुने विक्रम मोडणार
मोदींमुळेच राममंदीर झाले- राज ठाकरे
पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर तिसऱ्यांदा हिंदूस्तानाचे पंतप्रधान होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असा उल्लेख करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मोदीजी तुम्ही होता, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झाले. तसेच त्यांनी यावेळी, कार सेवकांचा उल्लेख करत, त्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी सांगितल्या. कलम 370, तिहेरी तलाक अशा मोदींच्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतूक यावेळी केले.
राज ठाकरेंच्या मोदींकडून अपेक्षा
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
– मराठा सम्राज्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवला जावा
– शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांचे आंतरराष्ट्रीय समिती स्थापनेद्वारे संवर्धन व्हावे
– मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यांपासून मुक्त व्हावा
– डॉ. आंबेडकरांच्या संविधान कोणीही बदलणार नाही हे ठामपणे सांगावे
– मुंबईच्या रेल्वे यंत्रणेवर जास्तीत जास्त लक्ष द्यावे, त्यासाठी निधी द्यावा
“उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारसदार आहेत. मात्र, त्यांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. आमच्याकडे शिवसेना तर तुमच्याकडे शिव्यासेना आहे. त्यामुळे, जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही.”
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
“शिवाजी पार्क ऐतिहासिक मैदान आहे. याच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक विकासाचे नवे पर्व सुरू करतोय. महायुती विकासावर बोलते. मात्र, विरोधक त्याला फाटे फोडून नको ते बोलतात. त्यांची भाषणे, त्यात वापरली जाणारे शब्द सुसंस्कृत महाराष्ट्राला छेद देणारे आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. तोच आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे.”
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
“याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ या वाक्याने बाळासाहेब ठाकरे भाषणाला सुरुवात करायचे. इंडिया आघाडीच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे देखील याच वाक्याने भाषणाला सुरूवात करत होते. मात्र, राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्द बोलणे सोडले आहे.”
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री