मुंबई : देशात करोनाचा कहर पाहायला मिळत आहे. करोनाबाधित रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र अनेकजण करोनामुक्त झाले तरी त्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. करोनामुक्त झालं म्हणजे लढाई संपली असं समजू नये, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. तसेच आरोग्यविषयक समस्येकडं दुर्लक्ष करू नये असही तज्ञांनी म्हटलं आहे.
नव्या संशोधनानुसार, करोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक दीर्घकालीन गुंतागुंत पाहायला मिळत आहे. तसेच रुग्णाचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी सुमारे 4 आठवडे त्या रुग्णात लक्षणं दिसून येतात. आकडेवारीनुसार 4 पैकी 1 रुग्णामध्ये दीर्घकाळ लक्षणं दिसून येतात. एका अहवालानुसार, करोनामुक्त रुग्णांना 1 आठवड्यानंतर किंवा1 महिन्यानंतर लक्षणं दिसू लागतात. यात सातत्याने खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायू दुखणं, ब्रेनफॉग यांचा समावेश असतो.
करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये मानसिक आजारांची लक्षणंही दिसत आहेत. त्यात मूड डिसॉर्डर, एकाग्रता कमी होणं, स्मृतीभ्रंश, तणाव किंवा चिंता, क्रोनिक इन्सोमेनिया किंवा आधाराशिवाय कोणतंही काम करण्यात अडचणी येणं अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये.
करोनामुक्त रुग्णांमध्ये किडनी विकार दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. पायांवर सूज दिसत असेल तर ही बाब गंभीर असू शकते, असं डॉक्टर सांगतात. जास्त लघवी होणं किंवा त्याचा रंग बदलणं याबाबी देखील असामान्य आहेत. अचानक वजन वाढणं, खराब पचनशक्ती किंवा भूक न लागणं ही लक्षणं किडनी विकाराशी निगडीत आहेत.
डायबिटीज किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी करोना धोकादायक ठरू शकतो. करोनाचा सामना करत असलेल्या रुग्णांनी आपली ब्लड शुगर लेव्हल सातत्याने तपासली पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त भूक किंवा तहान लागणं, अंधुक दिसणं, जखम भरून न येणं, अति थकवा, पायांमध्ये जडपणा वाटणं या लक्षणांकडे लक्ष ठेवावं.
या व्यतिरिक्त कोरोनामुक्त रुग्णांना ब्लड क्लॉट आणि हार्ट अटॅकसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं, खूप थकवा येणं अशा समस्या दिसून येतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.