तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ परिसरात शुक्रवारी (दि. १) अवकाळी पावसाचा शिडकाव झाला. त्यामुळे रब्बीचे हाताशी आलेले पीक जाण्याची भिती शेतकऱयांना वाटत आहे.
अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या भीतीने मावळ तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हाताशी आलेल्या रब्बीची ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांच्या नुकसानीची भिती वाटत आहे. मावळ तालुक्यात रब्बीची ज्वारी, गहू, हरभरा ही पिके चांगली आली असून काही दिवसात ती काढणीसाठी आलेली आहेत.
शुक्रवारी पहाटेपासूनच मावळ तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हलकी हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी बांधवामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळ तालुक्यात रब्बी पिकांचे क्षेत्र कमी असले तरी सध्या ज्वारी, गहू, हरभरा ही पिके काढणीस आलेली आहेत. मावळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी खरीप भातपिकाचे काढणीनंतर रब्बी पिकांच्या पेरण्या केलेल्या आहेत.