पुणे (राहुल गणगे) – करोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अगोदरच खचलेली आहे. एकीकडे सरकार मद्यालय, बाजारपेठा, आठवडी बाजार आदी सुरु करण्यास परवानगी देत आहे. मात्र राज्यातील मंदिरे बंद ठेवली जात आहेत. शासनाने तातडीने राज्यातील मंदिरे खुली करावीत, या मागणीसाठी भाजप व मनसेकडून घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. परंतु हा घंटानाद शासन दरबारी घुमणार का? आणि मंदिरे उघडणार का? याकडे व्यापारी, व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेली चार महिने मंदिरे, देवालये बंद ठेवली आहेत. सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास मनाई केली आहे. त्याचवेळी मद्यालय, बाजारपेठा, कार्यालये सुरू आहेत. गर्दीची ठिकाणांवरील बंधने शिथील केली आहेत. मंत्र्यांचे दौरे, विवाह समारंभ आदी सर्रास सुरु आहेत.
मंदिरे बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारी कुटुंबांपुढे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने त्यांना कोणतीही मदत दिली जात नाही. देशातील इतर राज्यात मात्र मंदिरे उघडण्यास स्थनिक सरकारने परवानगी दिली आहे. परंतु राज्यात मंदिरावरील बंदी का घालण्यात येते असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
करोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने सोमवारी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले. त्यामध्ये सनसेनेही घंटानाद आंदोलनात शंखनाद करीत जोड दिली आहे. करोना निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले. मात्र मंदिरे सुरू झाली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनारस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे उघडण्याची परवानगी तातडीने दिल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा व्यापारी व व्यावसायिकांना लागली आहे.
राज्यातील मंदिरे हा सुद्धा अर्थव्यवस्थेचा भाग आहे. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो.करोना काळात अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. शारिरीक स्वास्थ्यासाठी जसे शासनाने व्यायामशाळा उघडण्यास परवानगी दिली. तसेच नागरीकांचे मानसिक आरोग्य सदृढ होण्यासाठी मंदिर प्रशासनाला नियम घालून मंदिरे उघडण्याची परवानगी दयावी. यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक शंखनाद आंदोलन करीत आहोत.
– अजितदादा पवार, हवेली तालुकाध्यक्ष मनसे
सध्या करोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे घाई गडबडीत करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणे योग्य नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियम वअटींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी राजकारण न करता हातात हात घालून करोनाचा मुकाबला करणे गरजेचे आहे. सरकार तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन लवकरच मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेईल.
– देवीदास भन्साळी, उपाध्यक्ष भारतीय कॉंग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य