पुणे- शालेय पोषण आहारा योजनेअंतर्गत उन्हाळी सुट्टीतील पोषण आहाराच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू होणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या 86 हजार 400 शाळांमधील 1 कोटी 5 लाख विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 210 रुपये, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 315 रुपये याप्रमाणे रक्कम खात्यात जमा होणार आहे.
आतापर्यंत सुमारे 70 टक्के विद्यार्थ्यांनीच बॅंक खाती उघडलेली आहेत. शालेय पोषण आहार कक्षाकडून राज्यातील जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या स्तरावरून तो विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.