पुणे – खडकवासला धरणातून मुठा कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, धरणातून 1005 क्युसेक या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हे आवर्तन सुमारे 45 दिवस सुरू राहणार आहे. शेतीसाठी आर्वतन देण्यास सुरुवात झाल्याने हवेली, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील शेतीला याचा फायदा होणार आहे.
यंदा चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने धरणे 100 टक्के भरली. कालवा समितीच्या बैठकीत पाणीवाटपाचा निर्णय घेतला जातो. यावर्षीची कालवा समितीच्या बैठक अजून झाली नाही. मात्र, पिके जळू नयेत, शेतीला योग्यवेळी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक होते. या बैठकीस शहरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, पालिका व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित असतात. खडकवासला प्रकल्पात उपलब्ध असलेला साठा विचारात घेऊन पाण्याचे नियोजन केले जाते. सध्या खडकवासला, टेमघर, वरसगाव, आणि पानशेत असे चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा 24.42 टीएमसी म्हणजे 87.18 टक्के इतका उपलब्ध आहे.