नाणे मावळ (अतुल चोपडे-पाटील) – निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मावळमधून ऐकेकाळी मोठ्या प्रमाणात मध निर्मिती होत असे. मात्र जंगलतोड आणि फुलांवर होणारी किटक नाशकाची फवारणी याचा परिणाम मधमाश्यांच्या जिवनावर झाला आहे. यामुळे मावळमधून मधाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
मुंबई आणि पुणे या दोन्ही शहराच्या मध्यभागी असलेल्या मावळ तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. हा तालुका पवन, नाणे आणि आंदर अशा तीन विभागामध्ये विखुरला आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण यामुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव आले आहेत. त्यामुळे मानवाने निसर्गाची लचकेतोड करण्यास सुरवात केली आहे. काही ठिकाणी डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. वृक्षांची जंगले तोडून सिमेंटची जंगले तयार होत असल्याने औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेदिवस दुर्मिळ होत आहे.
मावळ तालुक्यात होत असलेल्या सततच्या जंगलतोडीमुळे कमी होणारे वृक्ष याचा थेट परिणाम मधाच्या उत्पादनावर झाला आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने मधमाश्याचा आश्रय हिरावला जात आहे. त्यामुळे मधमाशांना मधाकरिता पोळे तयार येत नाही. परिणामी मधाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चालले आहे.
मावळ तालुक्यात जंगल भागाला लागून असलेली गावे नैसगिक वनसंपदेसाठी प्रसिध्द आहे. मात्र वातावरणातील बदल, मानव निर्मित प्रदूषण, वृक्षतोड यामुळे मधमाशाची संख्या घटल्याने तसेच मधमाशीपालन करून मध निर्मिती उद्योगाला चालविला जात नसल्याने नैसगिक मध मिळणे अवघड होत आहे. सर्दी खोकला या सारख्या आजारावर प्राथमिक उपचार म्हणून मधाचा वापर केला जातो.
ग्रामीण भागात पर्यटक मध खरेदी प्राधान्य देतात. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले भुई सपाट होत आहे. परिणामी जंगलात वास्तव करणाऱ्या मधमाशांची संख्या कमी झाली असून याचा परिणाम अनेकांच्या रोजगारावर होत आहे.
रस्त्यावरील मधात गुळाचे प्रमाण अधिक
सर्व सामान्य जनतेला मिळणारे मध हे प्रमुख्याने स्थानिक आदिवासी बांधव जंगलातून गोळा करतात. नैसर्गिक मधाची सर्व सामान्यापासून तर श्रीमत लोक आवडीने खरेदी करतात. पण हे चविष्ठ मध दुर्मिळ होत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर मध विक्री होते. परंतु त्या मधामध्ये गुळाचे प्रमाण असल्याने नागरिक मध खरेदी करीत नाहीत.
फुले असूनही मध मिळेना
मावळ तालुका हा फूल उत्पादनात राज्यातच नव्हे तर देशात आघाडीवर आहे. “व्हॅलेंटाइन डे’ला येथील गुलाबाची फुले विविध देशात निर्यात होतात. फुलांमधून मधमाशा मध गोळा करीत असतात. फुलांवर रोगराई पसरू नये म्हणून बहुतांश शेतकरी कीटक नाशके फवारतात. याचा मोठा परिणाम मधमाशांच्या प्रजननावर झाला आहे. त्यातच जंगलांना लावला जाणाऱ्या वनव्यात वनसंपती नष्ट होत आहे. याचा परिणाम मध निर्मितीवर होत आहे.