उमेदवारीवरून पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ : तिरंगी की दुरंगी लढत
भाऊ ठाकूर
राहू : गेल्या तीन वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या चर्चेत राहिला आहे. अनेक पक्षांचे नेते हे बारामती लोकसभा मतदार संघाबाबत वक्तव्य करून हा मतदारसंघ चर्चेत आणत आहेत. अलीकडे महिला नेत्या व भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यामुळे बारामतीच्या राजकारणाला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने देखील बारामती जिंकायचीच, असा निर्धार केला आहे. त्याची तयारी म्हणून भाजपाच्या नेत्या व देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा देखील केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी देखील आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे अनेकवेळा बोलून दाखविले आहे.
2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मते घेतली होती. त्यामुळे ते बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निश्चितच टेन्शन वाढणार आहेत. आत्तापर्यंत मतदारसंघात विद्यमान खासदार यांच्यासमोर ताकदीचा नेता उभा राहिला नाही,किंवा ताकदीचा नेता टिकू शकला नाही, ही वस्तस्थिती आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने तो प्रयत्न केला होता, परंतु त्यात यश आले नाही. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, रासप व तृप्ती देसाई यांच्यात निवडणूक होऊ शकते, अशी चर्चा आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात कोणी कितीही आणाबाका घेतल्या तरी हा मतदारसंघ विरोधकांच्या ताब्यात जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. खासदार सुळे यांच्या जमेची बाजू आहेत.
जातीचा फॅक्टर चालणार का?
रासपचे अध्यक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढल्यास वेगळे चित्र निर्माण होऊ शकते. रासप हा जरी भाजपाचा सहयोगी सदस्य असला तरी, सध्याच्या परिस्थितीत त्याच्यात अंतर पडलेले दिसून येते. मतदारसंघात महादेव जानकर उभे राहिले तर ते निर्णायक लढा देऊ शकतात. कारण या मतदारसंघात धनगर समाजाची ताकत ही निर्णायक ठरू शकते, हे अनेक वेळा दिसून आले आहे. त्याचा प्रत्यय हा 2014 च्या लोकसभेच्या निमित्ताने आला आहे. त्यामुळे मतदारसंघात जातीय फॅक्टर हा प्रभावी होऊ शकतो.
मतविभागणीचा फटका कोणाला
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आहे. तो मतदार राष्ट्रवादीला कधीच अंतर देत नाही. त्यामुळे भाजपा, रासप, भूमाता ब्रिगेडने निवडणूक लढविल्यास मत विभागणी होऊन त्याचा फायदा हा राष्ट्रवादीलाच होऊ शकतो. त्यामुळे बारामती मतदारसंघात एकास एक लढत दिल्यास चुरस निर्माण होऊ शकते.
जानकरांची राष्ट्रवादीशी जवळीक
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा मागील काळात राष्ट्रवादीला कडवा विरोध होता. भाजपाचे सहयोगी सदस्य असल्याने व स्वतः बारामती लोकसभेला ते उभे राहिल्याने त्यांनी राष्ट्रवादीला टोकाचा विरोध केला. परंतु आता बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. जानकर हे भाजपाचे सहयोगी सदस्य असले तरी राष्ट्रवादीसाठी असलेली जवळीक ही बरेच काही सांगून जाते. त्यानुसार अनेक राजकीय गणिते बदलू शकतात.