अनेक हेक्टर जमीन पाण्याखाली ः शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
सोरतापवाडी – पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाइप लाइनचा एअर व्हॉल्व (कोरेगाव मूळ, कडवस्ती) येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गट नं. 135 मध्ये फुटून पाणी शेतात शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, शिंदवणे आदी गावांतून पाइप लाइन गेली आहे. यावर एअर वॉल आहेत. शनिवारी कोरेगाव मूळ येथील कडवस्ती येथे एअर व्हॉल्व फुटला. त्यामुळे अर्जुन तुकाराम कड यांच्या कांद्याच्या शेतात पाणी घुसून कांदे वाहून गेले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारानंतर पोलीस पाटील वर्षा कड यांनी घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
या प्रकाराची माहिती मिळाताच सरपंच पूजा शितोळे, उपसरपंच लोकेश कानकाटे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कड, समीर वाघ, अंकुश कड यांनी घटनास्थळी भेट दिली. अनेक दिवसांनीही योजना चालू केली असून त्यातच पुरंदरपर्यंत पाणी पोहोचण्याच्या आधीच पाइप लाइनचा एअर व्हॉल्व फुटला. तो एक दोन दिवसांत दुरुस्त करून योजना चालू केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करूनर भरपाईची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पोलीस पाटील वर्षा कड यांनी सांगितले.