नवी दिल्ली -संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा लवकरच जाहीर होईल, असे सूतोवाच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी केले. त्यातून त्यांनी अजेंड्याविषयी निर्माण झालेला सस्पेन्स कायम ठेवला.
मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र, अधिवेशनाच्या अजेंड्याविषयी अद्याप कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेने फोनवरून जोशी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, जोशी यांनी अजेंड्याचा सुगावा लागू दिला नाही.
काही महत्वाचे मुद्दे अजेंड्यावर आहेत. त्यांना अंतिम रूप दिले जात आहे. लवकरच अजेंडा वितरीत केला जाईल, अशी त्रोटक माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रथमच अशा प्रकारचे विशेष अधिवेशन होत आहे. त्या पाच दिवसीय अधिवेशनाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. अशात बोलावण्यात आलेल्या अधिवेशनाचे महत्व वाढले आहे.