Loksabha Election 1984 | यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’ चा नारा दिला आहे. त्यादृष्टीने देशभरात भाजप पक्ष कामाला लागला आहे. मात्र यापूर्वी काँग्रेसने 1984 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. भारतातील लोकसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. अशा परिस्थितीत देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची मोठी लाट उसळली होती. या लाटेचा परिणाम म्हणजे काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसने 514 पैकी 404 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष तेलगू देसम पक्ष होता, ज्याने 30 जागा जिंकल्या होत्या.
या निवडणुकीत जवळ जवळ 63 टक्के मतदान झाले म्हणजेच 40 कोटी मतदारांपैकी 25 कोटी 60 लाख मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 50 टक्के मतदान हे काँग्रेसला झाले होते आणि वयाच्या 40 व्या वर्षी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले.
कोणत्या राज्यात काँग्रेसला किती जागा ?
जर आपण राज्यनिहाय आकडेवारीबद्दल बोललो, तर 1984 मध्ये काँग्रेसची कामगिरी खूपच प्रभावी होती. यूपीमध्ये 85 पैकी 83 जागा, बिहारमध्ये 54 पैकी 48, हरियाणामध्ये 10 पैकी 10 आणि राजस्थानमध्ये 25 जागा जिंकल्या. दक्षिणेतही काँग्रेसचा झेंडा फडकला, कर्नाटकात 28 पैकी 24, केरळमध्ये 20 पैकी 13 आणि तामिळनाडूत 39 पैकी 25 जागा जिंकल्या.
याशिवाय काँग्रेसने आंध्रमध्ये 42 पैकी 30, गुजरातमध्ये 26 पैकी 24, मध्य प्रदेशात 40 पैकी 40 आणि महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकल्या होत्या. मात्र, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची जादू चालली नाही आणि तेथे सीपीआयने 42 पैकी 18 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या होत्या.
भाजपची पहिली निवडणूक
1980 मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. 1984 मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही.
पक्षाने 224 जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त 2 जागा जिंकल्या होत्या. सी. जंगा रेड्डी आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदारसंघातून पी.व्ही. नरसिंह राव यांचा पराभव करून विजयी झाले. तर गुजरातमधील मेहसाणा मतदारसंघातून ए.के पटेल विजयी झाले होते.भाजपच्या जवळपास 50 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
हेही वाचा:
”लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत, पण …”