अफवांवर विश्वास ठेवू नये; आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
मुंबई : कोरोना विषाणूवरील उपचारांबाबत व्हाटस् ऍप, फेसबुक आदी सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरत आहेत. ते मेसेज पूर्णपणे चुकीचे आहेत. आरोग्य विभागामार्फत असे मेसेज पाठवलेले नाहीत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमुत्र आदींच्या सेवनामुळे करोना व्हायरसवर उपचार शक्य असल्याचा संदेश वेगवेगळ्या डॉक्टरांच्या नावाने आणि आरोग्य विभागाचे नाव टाकून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. हे संदेश पूर्णपणे चुकीचे असून त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. दिशाभूल करणाऱ्या या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
ताजे अन्न, स्वच्छ व पूर्णपणे शिजविलेले अन्न खावे, पोषक आहार घ्यावा, हात धुवावेत, सर्दी किंवा खोकला झाला असल्यास नाका तोंडावर रुमाल ठेवून शिंकावे अशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.
करोनावर कुठलेही एक विशिष्ट औषध उपचार म्हणून नसून लक्षणांवर औषधोपचार केला जातो, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता चुकीच्या मेसजवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.