कापील, गोळेश्वर विभागातील प्रचार दौऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांची जोरदार टीका
कराड – राज्यातील सहकार चळवळीची मुहूर्तमेढ कॉंग्रेसने रोवली. यशवंतराव चव्हाण यांच्या कृषी-औद्योगिक समाज रचनेच्या धोरणातून सहकाराचा जन्म झाला.
यातूनच बहुजन समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मात्र विरोधकांचे सहकारातून सत्ताकारण हे एकमेव ध्येय आहे. त्यांना समाजाच्या सुख व दुःखाचे काही घेणे-देणे नाही. हे ओळखून कापील-गोळेश्वर विभागातील जनतेने गत विधानसभा निवडणुकीचा इतिहास कायम राखावा, असे आवाहन कराड दक्षिणचे आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कापील-गोळेश्वर, ता. कराड परिसरात त्यांनी सोमवारी प्रचार दौरा केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर, मनोहर शिंदे, जयेश मोहिते, पै. नानासाहेब पाटील, नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, वैभव थोरात, संभाजीराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, कापील आणि गोळेश्वरला आदर्श पाणीयोजना झाल्या, याचे समाधान वाटते. शुद्ध पाणीपुरठ्यामुळे या विभागात रोगराई कमी होईल. मी मुख्यमंत्री असताना कराड दक्षिणेतील मंजूर केलेल्या कामांना सरकार बदलल्यानंतर निधी मिळणार नाही, अशा वल्गना व्हायच्या. पण त्या कामांचे अध्यादेश निघाल्याने निधी मिळाला. त्या कामांबरोबर आणखी विकासाचा मोठा निधी आणता आला. लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव प्रत्येक मतदारसंघात निधी मिळतो. मी मुख्यमंत्री असताना पक्ष, गट-तट हा विचार बाजूला ठेवून निधीच्या कामात कुठेही दुजाभाव केला नाही.
ते म्हणाले, बहुजन समाजात सहकारातून पुढे आलेल्या नेतृत्वांना गेल्या पाच वर्षात भाजपने ईडी, सीबीआयची भीती दाखवली. अविनाश मोहिते यांनाही अशा प्रसंगातून जावे लागले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांनाही ईडीने नोटीस दिली. पण हाही त्यांचा राजकीय डाव असल्याचे उघड झाले.
जयवंतराव जगताप यांनी आपल्या भाषणात गोळेश्वरमधून निवडणुकीत मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही दिली. मनोहर शिंदे यांनी आपल्या भाषणात कापील-गोळेश्वरची जनता कायम विकासाच्या पाठीशी राहील, याबाबतची खात्री दिली. दौलतराव इंगवले यांनी आभार मानले.
यावेळी शिवाजी आत्माराम जाधव, वसंत जाधव, दिनकर उर्फ बाळूआण्णा जाधव, रणजित जाधव, माजी सरपंच बाबासाहेब जाधव, दिलीपराव डुबल, डॉ. विलासराव थोरात, सर्जेराव माने, कापीलचे उपसरपंच पराग जाधव, माजी सरपंच मोहनराव जाधव, गोकाकचे संचालक वसंतराव देशमुख, माजी अध्यक्ष भरत पाटील, प्रल्हाद देशमुख, अशोक जाधव, जयवंत जाधव, सागर पाटील, अंकुश देशमुख, तानाजी गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.